ते सगळे आमदार आणि महाविकास आघाडीतील अनेक पराभूत उमेदवार महायुतीसोबत येऊ पाहत आहेत, असेही मोठे विधान करत खळबळजनक दावा योगेश कदम यांनी केला आहे.शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहेत. खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे युवा नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट महायुतीत येऊ शकतो, असा दावा कदम यांनी केला. अजित दादा आणि शरद पवार यांच्या बैठका देखील झालेल्या आहेत, आपण माध्यमांतही पाहिलं होतं, त्यामुळे ते सगळे आमदार आणि महाविकास आघाडीतील अनेक पराभूत उमेदवार महायुतीसोबत येऊ पाहत आहेत, असेही मोठे विधान करत खळबळजनक दावा योगेश कदम यांनी केला आहे.
शुक्रवारी गृहराज्यमंत्री योगेश कदम दापोली, खेड दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांजवळ संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. कदम यांनी मोठे सूचक विधान केल्याने आगामी राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

योगेश कदम पुढे म्हणाले, की आता त्यांच्या देखील लक्षात आलं आहे की आता जवळपास पुढचे १५ ते २० वर्ष महायुतीची महाराष्ट्रातील सत्ता हलत नाही. सत्ता ही कायम राहणार आहे आणि म्हणूनच इतकं मोठं मताधिक्य मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार महायुती बरोबर जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही दावा योगेश कदम यांनी केला आहे. आणि म्हणूनच राजन साळवी जर का महायुतीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे.मुंब्रामध्ये मराठी तरुणाला झालेल्या मारहाणीवरुनही योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली. आपण हा व्हिडिओ पाहिला, या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. मराठी भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बाहेरून आपण कामधंद्यासाठी येत असताना मराठीला प्राधान्य द्यावंच लागेल. याबाबतीत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. असाही खणखणीत इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे.पालकमंत्री पदावरूनही योगेश कदम यांनी भूमिका मांडली असून उदय सामंत हे ज्येष्ठ नेते आहेत, ते ज्येष्ठ मंत्री आहेत, ते माझे मोठे भाऊ देखील आहेत, त्यामुळे आमच्यामध्ये पालकमंत्री पद हे त्यांना मिळाला हवं. त्यांना पक्षाने प्राधान्य द्यावे असेही आपण सांगितलं आहे. कोणत्याही पदावरून आमच्यामध्ये कधीही कोणतीही मतभेद नव्हते, आमच्यामध्ये कसलेही वाद नाही असेही योगेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.मी राज्यमंत्री व ते उद्योगमंत्री या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करत असताना रत्नागिरी जिल्ह्याला जास्तीत जास्त पुढे कसं घेऊन जाता येईल हा न्याय देण्याचं काम आम्ही करू आम्ही त्या पदाला जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करू असे योगेश कदम यांनी यावेळी सांगितलं.










