ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने एका कंटेनरला भीषण धडक दिली. या अपघातात दोघांचा अत्यंत भयावह असा अंत झाला आहे. या घटनेने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील चारणपाडा जवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. गतिरोधकावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रकने कंटेनरला मागून धडक दिली, ही धडक इतकी भीषण होती की कंटेनर रस्त्यावर उलटला आणि हा अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील मनोज जाटव (वय २७ रा. जालापुर ग्वालियर) यांच्यासह २ दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या लेनवर तालुक्यातील पळासनेर येथील चारणपाडा जवळ गतिरोधकावर ब्रेक फेल झाला आणि भरधाव वेगात असलेली आरजे ११ जीबी ०८८६ क्रमांकाच्या प्लायवूडने भरलेल्या ट्रकने पुढे चालणाऱ्या एचआर- ४७ डी-०७२१ क्रमांकाच्या कंटेनरला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की काही अंतरापर्यंत रस्त्यावर कंटेनरला घसरून नेले. त्यामुळे कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. तर ट्रकमधील चालक आणि सहचालक दोघेही कॅबिनमध्ये दाबले गेल्याने दोघांचा मृत्यू झाला.










