खरीप ज्वारी हे महाराष्ट्रातील पारंपरिक व आरोग्यास पोषक धान्य मानले जाते. यामध्ये फायबर, प्रथिने व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मधुमेह, हृदयरोग आणि पचनासाठी उपयुक्त अशा या धान्याला सध्या आरोग्यसंपन्न अन्न म्हणून मान्यता मिळत आहे. बदलत्या हवामानात टिकून राहणाऱ्या आणि कमी पाण्यावरही भरघोस उत्पादन देणाऱ्या या पिकाला शाश्वत शेतीत महत्त्वाची भूमिका आहे. अशा पार्श्वभूमीवर खरीप ज्वारी उत्पादनात मिळवलेले विक्रमी यश केवळ एक वैयक्तिक यश न राहता, आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक ठरते.नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील लहान वाघोदा गावचे प्रगतशील शेतकरी वसंत भास्कर शिंदे (वाघोदा ” खु ” ता रावेर ) यांनी मेहनत, अभ्यासू वृत्ती आणि आधुनिक शेतीतंत्रज्ञानाच्या साहाय्याने खरीप ज्वारी उत्पादनात राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा ऐतिहासिक मान पटकावला आहे. त्यांनी ३५.४४ क्विंटल प्रति हेक्टर इतके उच्च उत्पादन घेतले असून “खरीप ज्यारी सर्वसाधारण गटात” राज्यस्तरीय स्पर्धेत अव्वल प्रथम स्थान मिळवले आहे.










