विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी राहुल गांधी यांच्या भेटीवरून प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेत्यांना आव्हान दिलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे यांना ‘बालिश’ म्हटलं आहे.मुंबई: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तांबे यांनी राहुल गांधी यांच्या भेटीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी तांबे यांना ‘बालिश’ म्हटलं आहे. काँग्रेसने तांबे यांच्यासाठी खूप काही केले, पण ते अजूनही विचारपूर्वक बोलत नाहीत, असं थोरात यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींना भेटून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. तांबे म्हणाले होते की, “राज्यातल्या काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने राहुल गांधी यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना एक तासात भेटायला जाऊन दाखवावं.” तांबे यांच्या या टीकेवर बोलताना आता बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक शब्दांत फटकारलं आहे.”सत्यजीत तांबे बोलले हे खरं आहे. एकतर आपल्या जीवनात ज्यांनी आपल्यासाठी काही केलं आहे ते ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजेत. काँग्रेसने सत्यजीतसाठी खूप काही केलं आहे. पण त्यांचं बोलणं अजूनही बालिश आहेत. त्यांनी जरा विचार करून बोलावं. ते आता स्वतंत्र आहेत पण काय बोलावं आणि काय नाही हे शिकलं पाहिजे,” असा हल्लाबोल थोरात यांनी केला आहे.एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तांबे यांनी काँग्रेस नेत्यांना एक आव्हान दिले. ते म्हणाले, “प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधींची अपाँइटमेंट घेऊन एक तासात त्यांना भेटून दाखवावं. हे सोडा, कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधी यांना फक्त फोन करून दाखवावा. अशा प्रकारचं नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या जीवावर लढाई करायची?” असा प्रश्न तांबे यांनी विचारला होता.










