
कोकाटेंच्या भेटीशिवाय परतणार नसल्याचा पवित्रा कडूंनी घेतल्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडूंमध्ये फोनवर संवाद घडवून आणत, कर्जमाफीसंदर्भात येत्या गुरुवारी (दि. १७) मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. शेतकरी कर्जमाफीसाठी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंच्या भेटीसाठी सिन्नरकडे रवाना झालेले ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू आणि समर्थकांना पोलिसांनी मोहदरी घाटातच अडवले. परंतु, कोकाटेंच्या भेटीशिवाय परतणार नसल्याचा पवित्रा कडूंनी घेतल्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडूंमध्ये फोनवर संवाद घडवून आणत, कर्जमाफीसंदर्भात येत्या गुरुवारी (दि. १७) मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कडू यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी, १७ तारखेला कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर दर १५ दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार, असा थेट इशाराच सरकारला दिला.विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यसरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, त्यांच्या शेतीमालास हमीभाव मिळावा, यासाठी माजी आमदार कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवारी कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर मशाल आंदोलन केले.
याप्रसंगी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली. मात्र, या मोर्चावेळी कडू यांची नाशिकला कोकाटेंशी भेट होऊ शकली नाही. कडू यांनी ‘तुम्ही कुठे आहात,’ असा प्रश्न कोकाटे यांना केला असता, ‘मी ४० किलोमीटर लांब आहे,’ असे त्यांनी सांगितले. त्यावर कडू आणि समर्थक सिन्नरकडे रवाना झाले.परंतु, पोलिसांनी मोहदरी घाटात त्यांना अडवले. यावेळी कडू यांनी कोकाटेंना भेटण्याचा हट्ट धरला. परंतु, कोकाटे यांनी आपण मतदारसंघातील गावांमध्ये यात्रांनिमित्त फिरत असल्याचे सांगत भेटण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडू यांच्यात फोनवरून संवाद करून दिला. कोकाटे यांनी येत्या १७ तारखेला कर्जमाफीसंदर्भात बैठक बोलावली असल्याचे सांगत, त्यासाठी कडूंनाही आमंत्रण दिले.
त्यानंतर कडू यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. आम्ही आता १७ तारखेपर्यंत थांबत आहोत. त्यावेळी कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर दर १५ दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडू, असा इशारा त्यांनी दिला.राज्य सरकारसह आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावंर चर्चा करण्यासाठी येत्या १७ रोजी शेतकरी संघटनेसोबतच बैठकीचे आयोजन केल्याचे कोकाटेंनी कडूंना सांगितले. १७ तारखेनंतरही आम्ही तुमच्याशी चर्चा करू. तुमच्यासाठी रेड कार्पेट आहे. मी कधीही खोटे बोलत नाही. सरकार तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन कोकाटे यांनी यावेळी प्रहारच्या आंदोलकांना दिले.
Video Player
00:00
00:00