मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्यामुळे अपघातांची मालिका सुरू चआहे. बावनदीजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. नागरिकांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्ष सुरू आहे. मंत्री भोसले यांनी या महामार्गाची कालच पाहणी केली आहे. अशातच आज शुक्रवारी सकाळी झालेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ मालवाहू ट्रकच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. याबाबत नाराजीचा सूर आहे, काल बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील करण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. तालुक्यातील उक्षीपासून हातखंबापर्यंत रस्त्यांची दुरावस्था झालेली असताना यातच बावनदी स्टॉपजवळ शुक्रवारी दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात घडला. या अपघातात दोघे तरुण जागीच ठार झाले. गोव्यातून मुंबईच्या दिशेने मालवाहतूक ट्रक ( MH 08 HD 8292) जात करत होता. हा ट्रक बावनदी पुलाजवळ आला असता चालक मोहम्मद अफ्तार समशेर अली (वय 22, रा. नागनाथपूर जिल्हा सुलतानपूर) याचे वेगावरील नियंत्रण सुटले.हा ट्रक महामार्गावर एका बाजूच्या खोदून ठेवलेल्या भागात गेला. अपघातातील ट्रक हा लोखंडी वजनदार पाईपने भरलेला असल्याने ट्रकमधील सर्व लोखंडी पाईप थेट ट्रकच्या केबिनमधून बाहेर पडले. केबिनमध्ये असलेल्या चालकासह त्याचा सहकारी महंमद गुलाम रजब अली (वय 21 राहणार इब्राहिमपूर जिल्हा प्रतापगड) याच्या अंगावर पाईप पडल्याने या अपघातात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तसेच केबिनचा चक्काचूर झाला.या मार्गावर भीषण अपघातात दोन तरुण एकाचवेळी ठार झाल्याने ठेकेदार ईगल कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामावर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक केंद्रचे हेड कॉन्स्टेबल नाटेकर यांच्यासह इतर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून दोन तरुणांचा मृतदेह रत्नागिरीत पाठविण्यात आला. अपघातप्रकरणी पुढील कार्यवाही ग्रामीण पोलीस करीत आहे.ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती जणांना प्राण गमवावे लागणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करत आहे. या अपघातावरून ठेकेदार कंपनीसह महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्याना शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. ऊक्षी ते हातखंबा पट्ट्यात अनेक छोटे-मोठे अपघात घडतात. मात्र, संबधित महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच ठेकेदार कंपनीला याचे काही पडले नसल्याचे चित्र आहे.









