दिल्लीत एका वकिलाने आपल्याच परवाना असलेल्या बंदुकीने गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्याने असं का केलं याचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी गेल्या काही काळापासून ते तणावात असल्याची माहिती आहे.एका वकिलाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समीर मेहंदीरता (वय ४५) असे मृताचे नाव आहे. दिल्लीतील मुखर्जी नगर भागात वकिल समीर मेहंदीरता याने हे टोकाचं पाऊल उचललं. या वकिलाने त्याच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती आहे. मंगळवारी (७ जानेवारी) सायंकाळी त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोटाचा खटला सुरु आहे आणि त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहते. इकडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, समीर गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.२० वर्षांपूर्वी वकिल समीर मेहंदीरता यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगी आणि एक मुलगा आहे. पत्नीसोबत गेल्या अनेक काळापासून त्यांचा वाद होता. त्यामुळे पत्नी मुलासोबत वेगळी राहायची, तर समीर हे त्यांच्या मुलीसोबत राहत होते. गेल्या वर्षभरापासून त्यांचा घटस्फोटाचा खटलाही सुरु आहे.मंगळवारी दुपारी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनेनंतर समीर यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथे संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.गेल्या काही दिवसात पत्नीमुळे आत्महत्या करण्याचं हे तिसर प्रकरण आहे. अतुल सुभाष यांच्या मृत्यूचं प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. बंगळुरु येथे ९ डिसेंबर २०२४ ला अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी पत्नी निकिता सिंघानियाच्या त्रासाला कंटाळून आयुष्याची अखेर केली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ आणि २४ पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ज्यात त्यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या छळाबाबत सांगितलं होतं.त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी पुनीत खुराना प्रकरण समोर आलं. त्यांनीही पत्नी मणिकाच्या जाचाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं होतं. त्यांनी अखेरच्या व्हिडिओमध्ये पत्नी आणि सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं होतं.










