अमेरिकी भूवैज्ञानिक सेवेने या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी नोंदवली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या ईशान्येकडील खुम्बू हिमालयीन रांगेतील लोबुत्सेच्या ईशान्येला ९० किमी अंतरावर होता, असे चीन भूकंप नेटवर्क्स सेंटरच्या अहवालानुसार सांगण्यात आले.माऊंट एव्हरेस्टनजीक नेपाळ सीमेजवळील शिगाझे या पवित्र शहराजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या ६.८ तीव्रतेच्या भूकंपाने तिबेट हादरले. या नैसर्गिक संकटामध्ये १२६ जणांचा बळी गेला असून, १८८ जण जखमी झाले आहेत. शेजारच्या नेपाळमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. इमारतींना हादरे बसल्याने लोकांनी घाबरून रस्त्यावर धाव घेतली. भारतातही बिहार, आसाम व पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
प्रादेशिक आपत्ती निवारण मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप तिबेटमधील शिगाझे (शिगात्से) शहरातील डिंग्री काउंटी येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३५ वाजता (बीजिंगच्या वेळेनुसार सकाळी ९.०५ वाजता) झाला.अमेरिकी भूवैज्ञानिक सेवेने या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी नोंदवली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या ईशान्येकडील खुम्बू हिमालयीन रांगेतील लोबुत्सेच्या ईशान्येला ९० किमी अंतरावर होता, असे चीन भूकंप नेटवर्क्स सेंटरच्या अहवालानुसार सांगण्यात आले. पडझडीमुळे १२६ जणांचा मृत्यू झाला असून, १८८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली.भूकंपग्रस्त भागात तातडीने मदत आणि बचावकार्य करण्याचे आदेश चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी दिले आहेत. जखमींवर तत्काळ उपचार करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच पुढील आपत्ती टाळण्यासाठी, भूकंपग्रस्त भागातील रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचे आवाहन केले. चीनच्या भूकंप प्रशासनाने स्तर-२ची आपत्कालीन सेवा सुरू केली आणि आपत्ती निवारण कार्यात मदत करण्यासाठी घटनास्थळी एक पथकही पाठवले. १५००हून अधिक स्थानिक अग्निशामक आणि बचाव कामगारांनाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. चीनच्या केंद्रीय अधिकाऱ्यांनी भूकंपग्रस्त भागात आपत्ती निवारण सामग्री पाठवली आहे.दरम्यान, नेपाळमध्ये या तीव्र भूकंपामुळे उत्तरेकडील इमारतींना हादरे बसल्याने लोक घाबरून घरांबाहेर धावले. भूकंपाचे धक्के काभ्रेपलान्चोक, सिंधुपालचोक, धादिंग आणि सोलुखुंबू जिल्ह्यांमध्येही जाणवले.यापूर्वी सन २०१५मध्ये नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या ८.१ तीव्रतेच्या भूकंपातही शिगाझे शहराने मोठे नुकसान सोसले होते. तेव्हा या शहरात १८ जणांचा मृत्यू, तर ५५ जण जखमी झाले होते.










