सत्तारूढ ‘आप’कडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या भाजपने यंदा सर्वांत उशिरा पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पक्षाने दिल्लीतील १६ जागांवर उमेदवार बदलले असून १३ विद्यमान आमदारांना कायम ठेवले आहेदिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी २९ उमेदवारांची पहिली यादी अखेर जाहीर केली. प्रतिष्ठेच्या नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात माजी खासदार व माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे पुत्र प्रवेश वर्मा यांना मैदानात उतरवले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रवेश वर्मा यांनी, ‘आपण दिल्लीच्या जनतेला केजरीवाल यांचा शीशमहाल दाखविण्यास नेऊ,’ असे जाहीर केले.

सत्तारूढ ‘आप’कडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या भाजपने यंदा सर्वांत उशिरा पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पक्षाने दिल्लीतील १६ जागांवर उमेदवार बदलले असून १३ विद्यमान आमदारांना कायम ठेवले आहे. मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपने काल्काजी मतदारसंघामधून वादग्रस्त माजी खासदार रमेश बिधुरी यांना उमेदवारी दिली आहे. येथून काँग्रेसने अलका लांबा यांना मैदानात उतरविल्याने ही लढत चर्चेत राहणार आहे. भाजपने करोलबागमधून दुष्यंत गौतम, राजौरी गार्डनमधून मनजिंदर सिंग सिरसा, बिजवासनमधून कैलाश गेहलोत, तर गांधी नगरमधून काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल अरविंदरसिंग लवली यांना तिकीट दिले आहे.भाजपने दिल्लीत ‘आप’विरोधात पोस्टरयुद्ध हाती घेऊन केजरीवाल यांच्यावर ‘दिल्ली का राजा बाबू’ अशी टीका करणारे नवे पोस्टर भाजपने शनिवारी जारी केले. याआधी भाजपने केजरीवाल यांना ‘महाठग’ ‘इलेक्टोरल हिंदू’, अशी टीका केली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले. ‘केजरीवाल यांनी आपल्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या सुमारे १० वर्षांच्या कार्यकाळात राजधानीत पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी स्वत:साठी ‘शीशमहल’ बांधला,’ असा आरोप त्यांनी केला. नवी दिल्ली महापालिकेच्या सुषमा भवन या नोकरदार महिलांच्या वसतिगृहाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री असताना केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी वापरण्यात आलेल्या महागड्या वस्तू आणि उपकरणे यांची यादीच वाचली. ‘केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा सरकारी गाडी किंवा बंगला घेणार नाही, अशी शपथ घेतली होती. एक नव्या प्रकारचे राजकारण आणण्याचे आश्वासनही दिले होते; परंतु ते एक, दोन, तीन किंवा चार बंगल्यांनी समाधानी झाले नाहीत. त्यांनी दिल्लीवासींच्या ४५ कोटी रुपयांच्या खर्चातून ५० हजार चौरस यार्डच्या भूखंडावर शीशमहल उभारला,’ असा आरोपही शहा यांनी केला.










