मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातात आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. गेले 10 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.ठाणे: सोमवार 9 जूनला मुंब्रा येथे लोकल ट्रेनचा अपघात झाला होता. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता.काही जखमी प्रवासी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यातील एका प्रवाश्याचा मृत्यू झाला आहे. अनिल मोरे असे सदर व्यक्तीचे नाव असून त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या अपघातात गंभीर जखमी झालेले अनिल मोरे यांना सुरूवातीला कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले होते. गेले अनेक दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. ठाण्यातील वाशिंद येथून मुंबईत ते कामाला येत असत. या अपघातातील प्रवाशांच्या मृत्यूंची सख्या 5 झाली आहे. मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये इंजिनिअर सरोज, ठाण्यातील आयटी इंजिनिअर मयुर शाह, जीआरपीएफ जवान विकी मुख्यदल आणि दिवा येथील 28 वर्षीय राहुल गुप्ता यांचा समावेश आहे.कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने काही प्रवासी दरवाज्यावर लटकले होते. त्यावेळी समोरून आलेली लोकल क्रॉस होत असताना दोन्ही रेल्वेत दरवाज्यात लटकलेल्या प्रवाश्यांची धडक झाली आणि दुर्घटना घडली होती. सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले होते. तेथील जखमी रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून लोकल ट्रेन्समध्ये आपोआप बंद होणारे दरवाजे बसविले जातील असेही रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले होते. लोकल प्रवाशांचे होणारे हाल याबद्दल त्यावेळी राज ठाकरेंनीही आवाज उठवला होता.यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, एसी ट्रेन द्यायच्या त्या भाडे न वाढता द्यायच्या आहेत. असा मास्टर प्लॅन सरकारकडे आहे. रेल्वे गाड्यांना दरवाजे बसवण्याचे काम सुरू असून हवा खेळती राहील यासाठी सरकार उपाययोजना करेल. तसे डिझाईन सरकारकडे आहे.









