केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन झालं असून डोंगरावरून माती आणि दगड कोसळले. या दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ धामला जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन झालं आहे. भूस्खलन झाल्याने या मार्गावर मोठा अपघात झाला आहे. भूस्खलन होऊन डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि मोठे दगड कोसळले. ढिगाऱ्याखाली दबून झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहे. अपघातग्रस्त ठिकाणी बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याआधीही दोन दिवसांपूर्वी पावसामुळे केदारनाथ मार्गावर अपघात झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ धामला जाणाऱ्या ट्रेक मार्गावर जंगलचट्टी घाटाजवळील डोंगराच्या माथ्यावरून दगड पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले, अशी माहिती रुद्रप्रयाग पोलिसांनी दिली आहे.केदारनाथ मार्गावर १८ जून रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी जंगलचट्टी गधेरेजवळ डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि दगड कोसळले. यात पाच लोक ढिगाऱ्याखाली आले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ जंगलचट्टी येथील पोलिसांनी आणि डीडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि डीडीआरएफचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बाधितांना वाचवण्यात आलं.या अपघातात काही लोक केदारनाथ येथील मार्गावर बाजूलाच असलेल्या दरीत कोसळले होते. त्यांना वाचवण्यात पोलिसांत यश आलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गौरीकुंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याशिवाय दोघांचा यात मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटवली जात आहे. तर जखमी व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे. सततच्या पावसामुळे सोनप्रयाग आणि गौरीकुंडमध्ये प्रवाशांना रोखण्यात आल्याची माहिती मिळते आहे.दरम्यान, केदारनाथ भागात मोठा पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे केदारनाथ यात्रा रविवारी तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आली होती. रविवारी देखील मुसळधार पावसामुळे मातीचा ढिगारा खाली कोसळला होता. या ढिगाऱ्याखाली एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर दोघे जखमी झाले होते. हा धोका पाहता रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी सोनप्रयागच्या पुढे केदारनाथ यात्रा थांबवली होती. त्यानंतर काही काळाने यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र दोन दिवसांत पुन्हा एकदा आज मंगळवारी भूस्खलन होत अपघात झाला आहे.









