मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं प्लेईंग-11 कंडिशन्समध्ये बदल केले आहेत. सुधारित नियमांची अंमलबजावणी कसोटी क्रिकेटमध्ये जूनपासून, तर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये जुलैपासून होईल. तशा सूचना आयसीसीनं सदस्य देशांना दिल्या आहेत. प्लेईंग-11 च्या परिस्थितीत सगळ्यात मोठे बदल आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये होणार आहेत. सध्याच्या घडीला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन्ही बाजूंनी दोन नव्या चेंडूंचा वापर होतो. पण आता नव्या नियमांनुसार, एका डावात सुरुवातीची ३४ षटकं दोन्ही चेंडूंचा वापर होईल. त्यानंतर ३५ व्या षटकापासू एक चेंडू डाव संपेपर्यंत दोन्ही बाजूनं वापरला जाईल ३४ वं षटक संपल्यानंतर आणि ३५ वं षटक सुरु होण्यापूर्वी क्षेत्ररक्षण करणारा संघ दोनपैकी एका चेंडूची निवड करेल. पाऊस किंवा अन्य कारणांमुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं २५ किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा खेळ झाल्यास एकाच चेंडूचा वापर केला जाईल.
जो चेंडू ३४ व्या षटकापर्यंत वापरला जाणार नाही, तो बॅकअप म्हणून ठेवला जाईल.आता प्रत्येक संघाला सामन्यापूर्वी कन्कशन रिप्लेसमेंट म्हणून ५ बॅकअप खेळाडूंची नावं जाहीर करावी लागतील. यामध्ये १ फलंदाज, १ यष्टिरक्षक, १ वेगवान गोलंदाज, १ फिरकीपटू आणि १ अष्टपैलू खेळाडूचा समावेश असेल. बदली म्हणून आलेला खेळाडूदेखील जखमी झाला, तर मग सामनाधिकारी नवा पर्याय निवडू शकतो.
सीमारेषेवरील झेल आणि डीआरएसच्या नियमांमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. पण त्यांची माहिती नंतर दिली जाईल.नियमांमध्ये करण्यात आलेले बदल एका कार्यकारी गटाकडे पाठवण्यात येतील, असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. पण आता हाती आलेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीनं बदलांना मंजुरी दिलेली आहे. लवकरच एक कार्यकारी गट स्थापन केला जाईल. १९ वर्षांखालील विश्वचषक टी-२० स्पर्धा, ५० षटकांचे सामने हायब्रिड स्वरुपात खेळवायचे की नाही, याचा निर्णय हा गट घेईल. सिंगापूरमध्ये १७ ते २० जुलै दरम्यान होणाऱ्या वार्षिक संमेलनापूर्वी कार्यकारी गट स्थापन होईल, अशी आशा आहे.










