बारामतीत अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले. निरा डावा कालवा फुटल्याने परिस्थिती गंभीर बनली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पाहणी दौरा केला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यांना दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे.मागील तीन-चार दिवसांत बारामती परिसरात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि त्यात भर म्हणून बारामतीतून वाहणारा निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी बारामती तालुक्यात ठिकठिकाणी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तसंच मदतीबाबतची घोषणाही केली आहे.अजित पवार यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची घोषणा केली असून शेतकऱ्यांना काही काळ संयम ठेवावा, असं आवाहन केलं आहे. “ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत. बारामतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल, हे का एका झटक्यात होणार नाही. मी सातत्याने याबाबत माहिती घेत आहे. शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे, शक्य तेवढी मदत आम्ही करणार आहोत,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.दरम्यान, बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील आठवडाभरात मुसळधार पाऊस बरसला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झाले असून नुकसानग्रस्तांना आता शासकीय मदत कधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.










