या गुराख्याला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या पुतण्यावरही वाघाने हल्ला केल्याने तो जखमी झाला. मागील १३ दिवसांत व्याघ्रहल्ल्याच्या नऊ नऊ घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहेमूलपासून सुमारे दहा किमी अंतरावरील करवण शेतशिवारात गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला करून गुराख्याला ठार मारले. या गुराख्याला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या पुतण्यावरही वाघाने हल्ला केल्याने तो जखमी झाला. मागील १३ दिवसांत व्याघ्रहल्ल्याच्या नऊ घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल नियतक्षेत्रात बंडू परशुराम उराडे (५५) हे घरची गुरे चराईसाठी करवण येथील शेतशिवारात गेले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. त्यांना वाचविण्याकरता त्यांचा पुतण्या किशोर मधुकर उराडे (३५) हा गेला असता वाघाने त्याच्यावरही हल्ला केल्याने तो जखमी झाला. हे पाहताच इतर गुराखी धावून आले. त्यांनी वाघाला पिटाळून लावले. तोवर बंडू यांना वाघाने शंभर फुटापर्यंत फरफटत नेले होते. व्याघ्रहल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. वाघाला जेरबंद केल्याशिवाय मृतदेहाला हात लावणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चेअंती शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. वनविभागाच्यावतीने मृताच्या कुटुंबास ५० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. परिसरात गस्त वाढवून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.










