सरन्यायाधीश भूषण गवई मुंबई दौऱ्यावर असताना राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने माफी मागितली व यापुढे काळजी घेण्याची ग्वाही दिली. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई मुंबई दौऱ्यावर आले असता राजशिष्टाचाराचे पालन झाले नाही, याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने माफी मागितली. मुंबईत सरन्यायाधीशांच्या आगमनप्रसंगी राजशिष्टाचार पाळला गेला नाही. याबद्दल मी स्वत: त्यांना फोन करून सरकारच्यावतीने माफी मागितली. पुढच्या काळात राज्यात असे होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, अशी ग्वाही दिली, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. “काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत व त्यांची टीम सैनिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. देशाच्या संरक्षण करणाऱ्या सैनिकांवर राजकारण करण्याचे कारण नाही. शरद पवार यांनी महाआघाडीच्या नेत्यांना सूचना केल्या आहेत. ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला ऐकतील, असा विश्वास वाटतो,” असे बावनकुळे म्हणाले.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार दहशतवादाचा बिमोड करत आहे. दहशतवादविरोधी कारवाई करताना, बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांवर विश्वास ठेवावा,” असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला.दरम्यान, शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळणार नाही, याची सरकारकडून काळजी घेतली जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोगस बियाण्यासाठी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना केली आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.केव्हाही घोषणा भाजपच्या संघटन पर्वमध्ये तालुका पातळीवरील निवडणूक पूर्ण झाली आहे. ५८ जिल्हाध्यक्षांची निवड झाली. केंद्रीय समितीकडून प्रदेशध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.









