कल्याण रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे चार लाख प्रवासी प्रवास करत असल्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. मागील १३ वर्षात लोकल फेऱ्या वाढवण्याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे.मध्य रेल्वेचे प्रवेशद्वार आणि महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकातून दररोज चार लाख प्रवासी प्रवास करतात. दिवसागणिक वाढणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वच लोकल खचाखच भरून धावत असल्याने, दरवाजात लटकून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येते. गर्दीमुळे लोकलमधून पडून प्रवाशांना हकनाक जीवाला मुकावे लागते. यामुळे लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी असताना, मागील १३ वर्षांत याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.
मध्य रेल्वेचे कल्याण स्थानक हे अत्यंत वर्दळीचे स्थानक आहे. येथून दररोज मुंबईच्या दिशेने २०५ फेऱ्या धावतात आणि तितक्याच लोकल मुंबईकडून कल्याणच्या दिशेने येतात. या लोकलमधून दररोज तीन लाख ७६ हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्या पाहता, लोकलची संख्या अतिशय अपुरी असल्याने प्रवाशाचे हाल होतात. मध्य रेल्वेवर वर्षभरात जवळपास ७०० ते ८०० प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. मात्र रेल्वेकडून लोकल वाढविणे शक्य नसल्याचे उत्तर दिले जात आहे.मध्य रेल्वेवर २०१२-१३ मध्ये १५ डब्यांच्या लोकल धावू लागल्या. त्यावेळी लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या असल्या, तरी मागील १३ ते १४ वर्षांत एकही लोकल नव्याने वाढविण्यात आलेली नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.









