पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने कठोर आणि ठाम प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांचा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला. तथापि, यानंतरही पाकिस्तानने आपली नापाक कारवाई थांबवली नाही आणि भारतातील नागरी भागांना लक्ष्य करत पुन्हा हल्ले चढवले. मात्र प्रत्येक वेळी भारताने अधिक आक्रमक आणि ठाम प्रतिसाद देत पाकिस्तानला माघारी हटवले. भारताच्या या निर्णायक कारवायांमुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाली. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आणि युद्ध पेटण्याच्या सीमारेषेवर स्थिती पोहोचली. या तीव्र संघर्षाच्या तीन दिवसांनंतर अखेर शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर सहमती झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. मात्र या काळात मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट अॅक्टिव्हिटीमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईत एका 45 वर्षीय यंत्रमाग मालक तरुणाला पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची सुमारे सहा तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
काल मंगळवारी (दि. 13 मे) सकाळपासूनच एटीएस पथकातील एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन कर्मचारी मालेगाव शहरात गुप्तपणे कार्यरत होते. सायबर सेलकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुरुवार वॉर्ड परिसरातील घरावर छापा टाकून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद वेबसाईट सर्च केल्याचे निष्पन्न झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. यामध्ये काही वेबसाईट्स पाकिस्तानमधील असल्याचा संशय असून संबंधित व्यक्तीचे पाकिस्तानमधील कोणत्या व्यक्तींसोबत संपर्क आहेत का? याबाबत चौकशी केली जात आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी असलेल्या नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प स्थानकांवर सध्या मध्य रेल्वे आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) तर्फे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे हे दोन्ही रेल्वेस्थानक हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. आरपीएफचे 65 जवान आणि 15 रिझर्व्ह फोर्सचे कर्मचारी अशा एकूण 80 सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून नाशिक रोड स्थानकावरील सर्व चार प्लॅटफॉर्मवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याशिवाय, प्रवाशांची ये-जा बारकाईने तपासली जात असून, सीसीटीव्ही देखरेख, नाकाबंदी, आणि थेट गस्त यातही वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देवळाली रेल्वेस्थानकालगतच लष्कराच्या महत्त्वाच्या आस्थापना असल्याने, सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. पूर्वीही प्रवाशांच्या बॅगांची तपासणी होत असे, मात्र सध्या ही तपासणी अत्यंत सूक्ष्म आणि संशयावर आधारित पद्धतीने केली जात आहे.









