बुलढाण्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हृदयद्रावक म्हणजे या महिलेच्या लेकरांसमोरच तिचा मृत्यू झाला.राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने आपली हजरी लावली आहे. यामध्ये विजेचा कडकडाट गारपीट आणि पिकांच्या नुकसानासह जीवितहानी देखील आता समोर येत आहे. यातच एक मन हेलावून टाकणारी घटना बुलढाण्यातून समोर येत आहे.बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात आणि परिसरात 12 मे रोजी दुपारी अवकाळी पावसामुळे वीज पडली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. साधारणत: दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास आलेल्या या अवकाळी वादळी पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.चोरपांग्रा (वीरपाग्रा) येथील रंजना संदीप चव्हाण (वय वर्ष 35) ही महिला नित्यक्रमाने शेतात काम करीत असताना अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना बीबी येथील शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळेस ही दुर्दैवी घटना घडत होती त्यावेळेस त्यांच्याच जवळ काहीच अंतरावर दोन चिमुकली उभी होती. त्यांनी हा सर्व घटनाक्रम डोळ्यासमोर हा हृदयद्रावक प्रसंग पाहिला.










