भरदुपारी कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडून सलग दुसऱ्या दिवशी शहरासह उपनगरांतील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, अवकाळीचे हे संकट अजून दोन दिवस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी चार जणांचा बळी घेतला. शहरात पडून दोन दुचाकीस्वार तरुण, तर सुरगाण्यात विजेचा शॉक लागून एकजण ठार झाला. इगतपुरीत वीज अंगावर पडून तरुणीचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात पाच जनावरेही दगावली.झाड अंगावर सातपूर परिसरात सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास दुचाकीवर झाड कोसळल्याने गौरव भास्कर रिपोटे (वय २१, रा. गुलाबवाडी, नाशिकरोड) आणि पाठीमागे बसलेला त्याचा मित्र सम्यक नीलेश भोसले (१९) हे दोघे ठार झाले. सुरगाणा तालुक्यातील खडकी दिगर येथे विजेचा शॉक लागून देवीदास सीताराम भोये यांचा मृत्यू झाला. इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथील पूजा त्र्यंबक भांगरे (वय २३) हिचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत पाच जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.










