जळगाव, ५ मे (जिमाका वृत्तसेवा) – खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरीपपूर्व नियोजन बैठक अत्यंत महत्त्वाची असून ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या श्रमाचे नियोजन असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी दिलेली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडावी. अधिकारी व कर्मचारी यांनीही ही बाब लक्षात घेऊन काम करावे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगून खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे जळगाव व धरणगाव तालुक्यांकरिता संयुक्त खरीपपूर्व नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी बदलत्या हवामान व संभाव्य खरीप आव्हानांवर चर्चा करत शेतकऱ्यांना शाश्वत, शास्त्रशुद्ध शेतीसाठी सज्ज राहण्याचे मार्गदर्शन केले.










