अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थोरल्याशी वाद असल्याने 6 नराधमांनी धाकट्या भावाचा खून केला आणि त्याचा मृतदेह वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिला.अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेश नगर (ता. राहता) येथील एका तरुणाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून सहा तरुणांनी त्याच्या १९ वर्षीय भावाचे अपहरण करीत लोखंडी रॉडने त्यास मारहाण करीत त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रतीक वसंत सदाफळ (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून आणत सिन्नर-शिर्डी महामार्गावर सामाजिक वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला तो फेकून दिला. सोमवारी (दि.१४) सकाळी ९ वाजेच्या सुमारास या घटनेचा उलगडा झाला. सिन्नर याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
प्रतीक याचे शनिवारी (दि.१२) रात्री ११ वाजेच्या सुमारास गणेशनगर येथील निर्मळ हॉस्पीटलसमोरून अपहरण करण्यात आले. त्याला संशयितांनी सिल्व्हर रंगाच्या कारच्या डिक्कीत टाकून लांबवर नेत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जीवेठार मारले. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात वनीकरणात नालीच्या पायथ्याशी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून दिला. सोमवारी या परिसरात शेळ्या चारणाऱ्यास सकाळीच नऊ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला हा मृतदेह दिसल्यानंतर त्याने मुसळगाव पोलिसपाटलांना या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली.









