
नांदेडमध्ये शेतकऱ्याने औषधी मिरचीची लागवड केली असून यातून ते चांगलं उत्पन्न कमावत आहेत. पारंपरिक पिकाला बगल देत त्यांनी या मिरचीच्या लागवडीतून आर्थिक समृद्धी साधली आहे.नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील मिरची बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन घेत असतात. ही मिरची फक्त खाण्यासाठी वापरली जाते. मात्र नांदेडच्या नायगाव तालुक्यातील देगाव येथील शेतकऱ्याने औषधी मिरचीचा केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. या औषधी मिरचीच्या लागवडीतून शेतकरी मालामाल झाला असून तब्बल ४५ लाख रुपयांचा वार्षिक नफा कमावला आहे. त्याच्या या मिरचीचा ठसका आता पंचक्रोशीत पसरला असून त्यांच्याकडे पाहून शेकडो शेतकरी यासाठी पुढे सरसावले आहेत.बळवंत नागोराव बेंद्रे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. बेंद्रे यांची देगांव येथे १७ एकर शेती आहे. सुरुवातीला ते पारंपारिक पीक घ्यायचे, मात्र त्यांना म्हणावा तसा फायदा काही झाला नाही.
त्यामुळे त्यांनी तीन वर्षांपूर्वी औषधी मिरचीच्या लागवडीबाबत माहिती घेतली. त्यांनी एका कंपनीशी करार करून दहा एकरमध्ये मेडिकल मिरची म्हणजेचं औषधी मिरचीची लागवड केली. करारनुसार कंपनीकडून त्यांना प्रति क्विंटल २९ हजार रुपये प्रमाणे उत्पन्न मिळालं होतं. सलग तीन वर्ष बळवंत बेंद्रे यांनी आपल्या शेतात औषधी मिरचीचा प्रयोग केला.यंदा प्रति एकर ३ लाख रुपये प्रमाणे तब्बल ४५ लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचं बळवंत बेंद्रे या शेतकऱ्याने सांगितलं. एकरी पंधरा ते विस क्विंटल इतकं उत्पादन या मिरचीचं निघत आहे. लागवड, फवारणी, तोडणी, खत असं मिळून त्यांना साधारण खर्च एक लाख रुपये आला आहे. या औषधी मिरचीच्या लागवडीतून शेतकरी मालामाल झाला आहे. त्यांच्याकडून कंपनी स्वतः मिरची घेऊन जाते.विशेष म्हणजे नांदेडमध्ये सध्या औषधी मिरचीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा मोठा कल वाढलाय.
कमी खर्चात जास्त उत्पन्न या औषधी मिरचीच्या लागवडीतून होतं आहे. बळवंत बेंद्रे यांचा हा यशस्वी प्रयोग पाहून देगांवमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात इतर पीकांसोबतच मेडिकल मिरचीची लागवड केली आहे. ज्यातून त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे.मेडिकल मिरची ही साधारण मिरचीपेक्षा वेगळी असते. चवीला सपक असल्यामुळे त्याचा खाण्यासाठी वापर केला जातं नाही. यात औषधी गुणधर्म असून या मिरचीचा औषधासाठी वापर केला जातो. कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल होतं असतात. शेतकऱ्यांनी हतबल न होता कंपनीशी करार करून शेतात औषधी मिरचीची लागवड करावी, असं आवाहन बळवंत बेंद्रे यांनी केलं आहे.
Video Player
00:00
00:00