जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत निष्पापांचे प्राण घेतले. मृतांमध्ये पर्यटकांचा आकडा मोठा आहे.भोपाळ: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत निष्पापांचे प्राण घेतले. मृतांमध्ये पर्यटकांचा आकडा मोठा आहे. दहशतवादी हल्ल्याचे परिणाम काश्मीरमधील जनतेला भोगावे लागणार आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांचे हाल होणार आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट असताना काही जण सोशल मीडियावर अकलेचे तारे तोडत आहेत. पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे.
ओसाफ खानला मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीबद्दल बिनबुडाचा दावा करणाऱ्या मोहम्मदला पोलिसांनी अटक केली आहे. ओसाफ खान वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. २२ एप्रिलाला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात पती गमावणाऱ्या महिलेबद्दल ओसाफ खाननं तथ्यहीन दावा केला. महिलेनं पतीला मारण्यासाठी सुपारी दिली होती, असा संतापजनक दावा त्यानं केला होता.पहलगाम हल्ल्यात नौदलाचे अधिकारी विनय नरवाल मारले गेले. त्यावेळी त्यांची पत्नी हिमांशी नरवाल त्यांच्या सोबत होती. दोघांचा विवाह काही दिवसांपूर्वीच झाला होता. हिमांशी यांच्या हातात लाल रंगाचा चुडा होता. विनय यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्यानंतर हिमांशी त्यांच्या निष्प्राण देहाजवळ बराच वेळ बसून होता. त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख अगदी स्पष्ट दिसत होतं. निपचित पडलेले विनय नरवाल आणि त्यांच्या शेजारी शून्यात नजर लावून बसलेल्या हिमांशी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.पहलगाम हल्ल्यानंतर नरवाल दाम्पत्याचा हृदयद्रावक फोटो पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मात्र ओसाफ खाननं त्यावर संतापजनक कमेंट केली. ‘या महिलेची चौकशी व्हायला हवी. हिने मारेकऱ्यांना सुपारी दिली असावी आणि संधी मिळताच आपल्या पतीला संपवलं असावं,’ अशी शंका ओसाफनं व्यक्त केली. यानंतर ओसाफच्या कमेंटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.विनय नरवाल आणि हिमांशी यांचा विवाह आठवड्याभरापूर्वीच झाला होता. पतीच्या हत्येनंतर काही दिवसांनी त्यांनी आपबिती सांगितली. ‘आम्ही भेळपुरी खात होतो. तिथे एक बंदूकधारी आला. तू मुस्लिम नाही असं तो माझ्या पतीला म्हणाला आणि त्यानं पतीवर गोळी झाडली,’ असा घटनाक्रम सांगताना हिमांशी यांना अश्रू अनावर झाले होते. खानच्या पोस्टनंतर स्थानिक रहिवासी अभय श्रीवास्तव यांनी पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर खानला अटक झाली. या पोस्टबद्दल संताप व्यक्त होत आहे.









