काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता या दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, काश्मीरमध्ये जे झाले त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत राहिले पाहिजे, इथं राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी जी अॅक्शन घेतली ती भारताच्या विरोधी घेतली आहे. देशाच्या विरुद्ध असं कोणी निर्णय घेते तिथं राजकारण करायचे नसते. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातले. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.










