मुंबईतील वाढत्या कचऱ्यामुळे महानगरपालिकेने घनकचरा कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध करत ‘अदानी कर’ म्हणून टीका केली आहे. त्यांनी मुंबईकरांना या नव्या कराला कडाडून विरोध करण्याचे आवाहन केले आहे.मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे घनकचऱ्याचे प्रमाणही वाढल्याने कचरा व्यवस्थापनावरील खर्चातही भर पडली आहे. या खर्चाचा भार आता मुंबईकरांना सोसावा लागणार आहे. या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. “मुंबईकरांवर घन कचरा कर लावला जात आहे. हा अदानी कर असून तो आम्ही देणार नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “महापालिकेकडे कचरा उचलण्याची सर्व यंत्रणा असतानाही कचरा उचलला जात नाही. त्यातच आता देवनार डम्पिंग ग्राऊंड हे अदानीच्या घशात घातलं जाणार आहे”, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
“मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कचऱ्यावर कर लावला जाणार आहे. देवनार डम्पिंग ग्राउंड अदानीला दिला जातोय. या सरकारने गेल्या अडीच वर्षांत मुंबई महानगरपालिकेची लूट केली आहे. मी सगळ्या मुंबईकरांना आवाहन करत आहे की या घन कचरा शुल्काचा कडाडून विरोध करा”, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.”गेल्या अडीच वर्षांत रस्त्यांची दुरवस्था, पाण्याची बिकट परिस्थिती आपण पाहिलीच आहे. कचरा तर उचललाच जात नाही. ती यंत्रणा तुमच्याकडे आहे मग पैसे कशाला लावताय?”, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.”2.5 ते 3 हजार कोटींचा बोजा मुंबई महापालिकेवर म्हणजे जनतेवर पडणार आहे. मुंबई महापालिका आपल्याकडे होती, तेव्हा असे कोणतेही छुपे कर आपण लावले नव्हते. तसेच आपण 500 चौरस फूटांच्या घरावर मालमत्ता शुल्क माफ केले होते. मात्र, आता एप्रिल फूल सरकार जनतेवर घनकचरा शुल्क लादत आहे. असे अनेक छुपे कर, अदानी कर लादले जात आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.”हे तर एप्रिल फुल सरकार. गेल्या शंभर दिवसात या सरकारने काहीच काम केलं नसून या लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या योजना असतील, तसेच शिवभोजन थाळी ही योजना देखील बंद केली, मध्यान आहारमधून अंडी बंद केली. त्यामुळे हे सरकार एप्रिल फुल.









