शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबतच्या विधानावर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवते आणि विरोधकांची इच्छा महत्त्वाची नसते.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत केलेल्या विधानावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवते, सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही,” अशा शब्दांत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर ( ट्विटर) पोस्ट करत संजय राऊत यांच्या वक्तव्याला राजकीय स्टंटबाजी असल्याचे म्हटले. “७५ वर्षांनंतर नरेंद्र मोदींनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही. भाजपच्या अधिकृत धोरणातही असे काही नमूद केलेले नाही. तसेच भारतीय संविधानातही अशा प्रकारचा कोणताही ठराव नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.बावनकुळे यांनी इतिहासातील उदाहरणे देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. “भारतीय लोकशाहीत अनेक पंतप्रधान वयोमानानुसार मोठ्या वयातही देशाचे नेतृत्व करत राहिले. अटलबिहारी वाजपेयी ७९ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. मोरारजी देसाई यांनी ८३ व्या वर्षी पंतप्रधानपद भूषवले, तर डॉ. मनमोहन सिंग ८१ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. मात्र, भाजप द्वेषाने पछाडलेल्या संजय राऊतांना हे आठवत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच “पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे हे संजय राऊत किंवा विरोधक नाही, तर लोकशाहीतील जनादेश ठरवतो. मोदींच्या नेतृत्वावर देशाची जनता विश्वास दाखवते. त्यामुळे त्यांची निवृत्ती विरोधकांच्या इच्छेवर अवलंबून नाही,” असेही बावनकुळे म्हणाले.“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्प केला आहे आणि तो त्यांच्या नेतृत्वाखालीच पूर्ण होईल,” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजप नेत्यांचे हे विधान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी मोदींच्या निवृत्तीबाबत केलेल्या विधानानंतर भाजपकडून जोरदार प्रतिउत्तर येत असून यावर शिवसेनेची अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.









