नागपुरात हिंसाचाराची भयंकर घटना घडली. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागाने याबाबत अलर्ट दिल्याचं सांगितलं जात आहे.नागपुरात सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंडचा ठपका असलेला फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक जणांना अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी सर्व बाजुंनी तपास करत असल्याची माहिती आहे.नागपुरातील हिंसाचारानंतर अजूनही परिसरात संचारबंदी कायम आहे. आज परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी उठवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी १० एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.नागपूर हिंसाचार प्रकरणी आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या राज्यव्यापी आंदोललामुळे राज्यात हिंसक पडसाद उमटू शकतात, अशी माहिती आधीच गुप्तहेरांनी दिली होती, असं समोर आलं आहे. गुप्तहेरांनी याबाबतची माहिती दिल्यावरही पोलीस खातं गाफील होतं का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून विहिंप आणि बजरंग दलाने औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं, त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यातच अनेक नेतेमंडळींकडूनही यावर वक्तव्य केलं जात होतं. त्यामुळे याचा आढावा घेऊन गुप्तहेर संस्थांनी असा अंदाज लावला होता की राज्यात याचे हिंसक पडसाद उमटू शकतात. राज्यात तणाव निर्माण होऊ शकतो याची पूर्वकल्पना गुप्तहेर संस्थांनी सरकार आणि पोलिसांना दिली होती, अशी माहिती आहे. हे नेमकं कुठे हेईल याची माहिती जरी नसली, तरी राज्यात असं काही होऊ शकतं याची कल्पना देण्यात आली होती.
सोमवारी (१७ मार्च) सकाळपासूनच नागपुरात वेगवेगळ्या घटना घडत होत्या. ज्याचा अंदाज घेऊन नागपुरात त्यादिशेने पावलं उचलली जायला हवी होती, सुरक्षा वाढवण्यात यायला हवी होती, ते झालं की नाही हे पाहावं लागणार आहे. पण, हा हिंसाचार रोखता आला असता का, असा प्रश्न आता या निमित्ताने लोकांकडून विचारला जात आहे.










