नागपुरात दोन गटात वाद झाला, त्यातून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. याबाबत आमदार प्रविण दटके यांनी ही घटना ठरवून घडवून आणण्यात आल्याचा आरोप केला आहे.नागपुरात सोमवारी रात्री दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी दगडफेक आणि जाळपोळेचीही घटना घडली. त्यानंतर नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर, पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ८० जणांना ताब्यात घेतलं आहे.या घटनेबाबत भाजपचे आमदार प्रविण दटके यांनी नाराजी व्यक्त केली असून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिस वेळेत आले असते तर ही घटना टळू शकली असती असं ते म्हणाले.हे सगळं पूर्वनियोजित होतं. ज्या रस्त्यांवर दोन्ही समाजाच्या गाड्या राहतात त्या रस्त्यावर फक्त एकाच समाजाच्या गाड्या होत्या, दुसऱ्या समाजाच्या गाड्या पार्कही झाल्या नव्हत्या.










