एक तरुण अचानक पोलिस स्टेशनला आला आणि म्हणाला की त्याने त्याच्या गर्लफ्रेण्डची हत्या केली आहे. जेव्हा पोलिसांनी त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना तिथे कोणीही सापडलं नाही.मी एका तरुणीची हत्या केली आहे. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या तरुणाचे म्हणणे ऐकून पोलिसही चक्रावून गेले. माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक आणि एसीपीने त्या तरुणाला सोबत घेतलं आणि फोर्सच्या मदतीने मुलीचा शोध सुरू केला. रविवारी (१६ मार्च) लखनऊच्या गोमतीनगर पोलिस ठाण्यात हा तरुण आला होता. त्याने सांगितलेल्या ठिकाणी आणि त्याच्या आसपास शोध घेऊनही तरुणीचा मृतदेह सापडला नाही. मात्र, त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांना एक स्कार्फ आणि इतर काही वस्तू सापडल्या. सध्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.
गोमती नगरचे निरीक्षक राजेश कुमार त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाराबंकीतील लखपेडाबाग येथील रहिवासी अमन कश्यप हा विभूतीखंड येथील मधुरिमा स्वीटजवळील ओव्हरब्रीजखाली राहतो आणि मजूर म्हणून काम करतो. रविवारी सकाळी अमनने गोमतीनगर पोलिस स्टेशन गाठून सांगितलं की, शनिवारी संध्याकाळी ५:४५ वाजता ओव्हरब्रीजजवळ त्याला निधी नावाची तरुणी भेटायला आली होती. बराच वेळ एकत्र घालवल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग झोपी गेलो. त्यानंतर सकाळी उठल्यावर निधीने त्याला बाराबंकीला सोडण्यास सांगितलं. तेव्हा अमनने तिला सांगितलं की त्याच्याकडे पैसे नाहीत. तेव्हा निधीने त्याला रेल्वे रुळाच्या बाजुने बाराबंकीला चालत जाऊ असं सांगितले. यानंतर दोघेही पायी पायी हुसादिया रेल्वे क्रॉसिंगवर पोहोचले.यादरम्यान कुठल्यातरी गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला आणि हाणामारीही झाली. अमनने दिलेल्या माहितीनुसार म्हणण्यानुसार, राग आल्यानंतर त्याने प्रथम हाताने निधीचा गळा दाबला आणि नंतर तिच्याच स्कार्फने तिचा गळा आवळला. ती बेशुद्ध होऊन पडली तेव्हा तिचा मृत्यू झाला असं वाटलं. त्यामुळे तो तिथून पळून आला आणि मग पोलिसांत गेला.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक राजेश कुमार त्रिपाठी आणि एसीपी गोमती नगर विनय कुमार द्विवेदी अमनसह घटनास्थळी पोहोचले. स्कार्फसोबत इतर काही वस्तू सापडल्या पण मृतदेह सापडला नाही. निरीक्षकांच्या मते, गळा दाबल्याने मुलगी बेशुद्ध झाली असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर, ती कुठेतरी गेली असेल. सध्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, विभूतीखंड ते हुसाडिया रेल्वे क्रॉसिंगपर्यंत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेज तपासून मुलीचा शोध घेण्यात येत आहे.









