महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज कांदिवली येथील LIC कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना चांगलंच सुनावलं.महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS Protest) पुन्हा एकदा मुद्द्यावरुन आक्रमक होताना दिसत आहे. एअरटेल कंपनीच्या गॅलरीत काल मराठी भाषेवरुन जो वाद झाला त्यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. अखेर कंपनीला या प्रकरणी माफी मागावी लागली. महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलायची काय गरज आहे? असं वक्तव्य तिथल्या एका महिला कर्मचाऱ्याने केलं होतं. या प्रकरणाचा वाद मिटत नाही तोच मनसे आज पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेली बघायला मिळाली. मनसे कार्यकर्त्यांनी आज एलआयसी कार्यालयात दाखल होत तिथल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. एलआयसी कंपनीकडून मराठी भाषेला डावललं जात असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी केला. तसेच जोपर्यंत डिवीजन मॅनेजरची लिखित स्वरुपात माफी मिळत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नसल्याचा पवित्रा मनसे कार्यकर्त्यांनी घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज कांदिवली येथील LIC कार्यालयात गेले. कांदिवली पूर्व येथील स्वप्न सिद्धी इमारतीत एलआयसीचं कार्यालय आहे. मराठी भाषेला डावलण्यात आल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एलआयसीने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली. एलआयसीचा अर्ज हा इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. पण मराठी भाषेत एलआयसीचा अर्ज नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले. मनसे कार्यकर्त्यांनी एलआयसीच्या कार्यालयात जावून तिथल्या कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला. दरम्यान, एलआयसीकडून इंग्रजी आणि गुजरातीला प्राधान्य दिलं जात असल्याचा दावा आता केला जातोय.यावेळी आंदोलकांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.










