येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले. यानंतर संतापाची लाट पसरली आहे. आता धाराशिव जिल्ह्यातही संतोष देशमुख प्रकरणासारखीच घटना उघडकीस आली आहे.जिल्ह्यातील भूम येथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आली असून या तरुणाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून विवस्त्र अवस्थेत त्याला शिवारात फेकण्यात आले. सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.
प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, माऊली गिरी नावाचा तरुण घरी एकटा असताना त्याला सात ते आठ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड अन् काठीने अमानुष मारहाण करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची चर्चा आहे.
मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले. तरुणाला पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण झाली आहे. त्याच्या गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती समोर येत आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणात सतीश जगताप याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र ज्या पद्धतीने ही अमानुष मारहाण करण्यात आली. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला आहे.









