ओपिल सिंग दिल्लीत मजुरी करतात. त्यांनी सांगितले की आमचे तिकीट कन्फर्म झाले होते, पण गर्दी इतकी होती की आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला.नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन तीन बालकांसह १८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बिहारमधील नऊ, दिल्लीतील आठ आणि हरियाणातील एकाचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतरही रविवारी दुपारी स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी दिसली. या अपघातात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी ओपिल सिंह यांची ७ वर्षांची मुलगी रिया हिचाही मृत्यू झाला. चेंगराचेंगरीदरम्यान रियाच्या डोक्यात एक खिळा घुसला.
ओपिल सिंग दिल्लीत मजुरी करतात. त्यांनी सांगितले की आमचे तिकीट कन्फर्म झाले होते, पण गर्दी इतकी होती की आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या पत्नी आणि मुलीसह प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरुन खाली उतरत होतो, पण गर्दी पाहून आम्ही परत येऊ लागलो. मी माझ्या पत्नीला सांगितलं, की खूप गर्दी आहे, चल घरी जाऊया, तुम्ही ट्रेनमध्ये चढू शकणार नाही, लहान मुले आहेत, त्यांना झोपायलाही जागा मिळणार नाही.‘प्लॅटफॉर्मवर गर्दी एकाएकी वाढू लागली आणि चेंगराचेंगरी झाली. मी प्रयागराजला जाणारी ट्रेन सोडली आणि घरी परतण्यासाठी पुलावरून वाट धरली आणि पायऱ्या चढू लागलो. त्या वेळी समोरून शेकडो लोक खालच्या दिशेने आले आणि जागेसाठी त्यांचे सामान देऊन ट्रेन पकडण्यासाठी धावाधाव करीत होते. इतक्यात मुलीचा हात माझ्या हातातून निसटला आणि ती पायऱ्यांजवळील रिकाम्या जागेत पडली.’असं ओपिल सिंह यांनी साश्रू नयनांनी सांगितलं‘गर्दी वाढल्याने तिच्यावरून लोक धावले आणि दबाव वाढल्याने लोखंडी रॉड तिच्या डोक्यात घुसला. तेव्हा रुग्णवाहिका नव्हती आणि आमची पर्सही खाली पडली होती. दोन कुलींनी प्रत्येकी १०० रुपयांची मदत केली. अर्ध्या तासांच्या कसरतीनंतर तिला रुग्णालयात घेऊन गेलो; पण खूप उशीर झाला होता’ असं ओपिल सिंह म्हणाले.डॉक्टर म्हणाले, की तुम्ही जरा लवकर आला असता, तर बरे झाले असते. आपले अश्रू रोखत ओपिल सिंह यांनी आपल्या मोबाईलवर मुलगी रियाचा फोटो दाखवला. मोबाईल स्क्रीनच्या काचेवर भेगा आणि ओरखडे दिसत होते. ओपिल यांनी संतापून विचारलं, की माझी मुलगी सरकारकडून १० लाख रुपये घेऊन परत येईल का? पण या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नव्हतं.









