ठाकरे गटाचे ५ आमदार आणि ३ खासदार संपर्कात असल्याचा दावा करत शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकच खळबळ उडवून दिली. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे.मुंबई: ठाकरे गटाचे ५ आमदार आणि ३ खासदार संपर्कात असल्याचा दावा करत शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकच खळबळ उडवून दिली. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे. अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. त्यामुळे फुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेले मोजके शिलेदार आता त्यांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्या कार्यक्रमाला ठाकरेसेनेचे अनेक नेते, आमदार, खासदार अनुपस्थित राहिल्यानं चर्चांनी जोर धरला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अंधेरीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ठाकरेसेनेचे अनेक आमदार, खासदार गैरहजर होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आमदार दिलीप सोपल, राहुल पाटील, बालाजी काळे, खासदार संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील कार्यक्रमाला अनुपस्थित होते.जयंती निमित्त आयोजित सोहळ्याला अनुपस्थित राहिलेले नेते यांचे त्या दिवशीचे अन्य कार्यक्रम आधीच ठरलेले होते. त्यांनी याची कल्पना पक्षाला दिलेली होती, अशी माहिती ठाकरेसेनेच्या नेत्यांकडून देण्यात आली. नेत्यांच्या गैरहजेरीवरुन प्रश्न विचारणाऱ्यांना शिवसेना काय आहे ते माहीत नाही, अशी तिखट प्रतिक्रिया ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. हा कार्यक्रम मुंबईत होता. त्यामुळे राज्यातील अन्य नेते या कार्यक्रमाला गैरहजर होते, असं राऊत यांनी सांगितलं.बाळासाहेबांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी आमदार राजन साळवी आणि वैभव नाईकदेखील गैरहजर होते. पक्षात उभी फूट पडल्यानंतरही दोन्ही नेते ठाकरेंसोबत राहिले. दोघेही कोकणातले आहेत. विधानसभेत त्यांचा पराभव झालेला नाही. तेव्हापासून त्यांच्या पक्षबदलाची चर्चा सुरु आहे. साळवी ठाकरेंना रामराम करुन शिवसेना किंवा भाजमध्ये प्रवेश करु शकतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली. त्या बैठकीत ठाकरेंनी त्यांचा पाणउतारा केल्याचं समजतं.शिवसेनेचे ५ आमदार आणि ३ खासदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते उदय सामंत यांनी केलेला आहे. पण जयंतीच्या कार्यक्रमात काहीशी उलट स्थिती दिली. ५ खासदार आणि ३ आमदार गैरहजर राहिले. ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं जात असल्याची चर्चा आहे. ठाकरेंचे खासदार फोडण्यात शिंदेंना यश आल्यास दिल्लीच्या राजकारणात शिवसेनेचं वजन वाढू शकतं.









