भुसावळ शहरातील सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आवर घालण्यासाठी पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाई केल्या जात आहेत. गुन्हेगारी आणि उपद्रव थांबवण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय घेत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी चार जणांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहे. त्यात २ जणांना दोन वर्षासाठी तर दोघांना एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील उपद्रवी आणि गुन्हेगारांविरूध्द पोलीस प्रशासनाने मोहिम उघडली आहे. यात शहरातील काही गुन्हेगारी वृत्तीचे व उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले होते.
त्यावर संबंधितांचे म्हणणे ऐकून घेत प्रांताधिकारी पाटील यांनी चार जणांच्या हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय दिला आहे. यात दोघांना दोन वर्षासाठी तर दोघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. भुसावळ पालिकेची निवडणूक होणार असून शांततेत आगामी पालिका निवडणुका पार पडाव्यात या पार्श्वभूमिवर यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. उपद्रवींचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भुसावळचे डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया पार पाडली.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये मुस्लीम कॉलनीतील अफताब शेख समीउल्लाह याला एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शहरातील गौसिया नगरातील रहिवासी सैय्यद आफताब सैय्यद अरमान उर्फ अप्या याला एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले, तर भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंभोरा येथील नशीरशहा जनाबशहा फकीर याला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. तसेच मुस्लीम कॉलनीतील अवलीया मशीदीजवळील रहिवासी शेख मुस्ताक शेख अनवर याला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.









