शेतकऱ्यांना न्याय, हक्कासाठी धरणगावात उबाठा सेनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
शासनाला महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ ग्रंथ वाचण्याची गरज; गुलाबराव वाघ
धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर,
धरणगाव : शेतकऱ्यांना न्याय, हक्क, अधिकारासाठी व विविध मागण्यांसाठी शिवसेना (उबाठा) तर्फे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली धरणगावात छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर लाक्षणिक उपोषणास सुरूवात झाली. या उपोषणात शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यासह सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही डी पाटील, उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, सौ. जनाताई पाटील, भागवत चौधरी, जानकिराम पाटील, दिपक सोनवणे, लिलाधर पाटील, संतोष सोनवणे, परमेश्वर महाजन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, अरविंद देवरे, गोपाल पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी शासनाचे अन्यायकारक धोरणबाबत मनोगत व्यक्त केले. तदनंतर शिवसेना (उबाठा) सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी उपोषणस्थळी आपल्या मनोगतात सांगितले की, भारत हा कृषिप्रधान देश असुन भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शेती हा आजही सर्वांचा प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा व शेतकऱ्यांविषयी कळवळा वर्तमान सरकारला नसल्याने गेल्या दहा वर्षात असंख्य शेतकऱ्यांनी मृत्यूला आपलेसे केले आहे. पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिड वर्ष आंदोलन केले. आंदोलन दरम्यान शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेला तरी देखील ह्या निर्दयी सरकारला जाग आली नाही. म्हणून शेतकऱ्यांचं स्वास्थ्य व हित जपणे काळाची गरज असताना केंद्र व राज्याचे निर्दयी सरकार शेतकऱ्यांचा उरावर उठले आहे. ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांनी शेतात पेरणी न करता वर्षभर शेत पडीक ठेवल्याने तत्कालीन व्यवस्थेला धक्का बसला होता. ह्या निर्दयी सरकारला महात्मा ज्योतिबा फुले लिखित शेतकऱ्यांवर आधारित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा अनमोल ग्रंथ वाचण्याची गरज असल्याचे श्री.वाघ म्हणाले.










