दीपनगर औष्णिक ऊर्जा केंद्र विस्तारावर विधानपरिषदेत चर्चा : एकनाथराव खडसे यांचा ८०० मेगावॉट प्रकल्पासाठी पाठपुरावा..

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील दीपनगर औष्णिक ऊर्जा केंद्राचा कायापालट करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या ऊर्जा विकासाला गती देण्यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत जोरदार आवाज उठवला आहे. दीपनगर येथील जुना झालेला २१० मेगावॉटचा संच क्रमांक ३ बंद करून त्याजागी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ८०० मेगावॉट क्षमतेचा नवीन ‘सुपर क्रिटिकल’ संच तातडीने कार्यान्वित करावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहात या प्रकल्पाची सद्यस्थिती मांडताना सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले संच क्रमांक ३ हा आता जुना आणि कालबाह्य झाला असून त्याची कार्यक्षमता घटली आहे. या संचाचा देखभाल खर्च वाढत असून तो पर्यावरणाच्या निकषातही बसत नसल्याने तो टप्प्याटप्प्याने बंद करण्याची गरज आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत या जागेवर नवीन ८०० मेगावॉटचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता, त्याचे काय झाले? असा रोखठोक प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला.

नवीन संचासाठी आवश्यक असणारी जमीन, पाणी, कोळसा पुरवठा आणि पर्यावरणीय मंजुरी याबाबतचे तांत्रिक अभ्यास आणि सर्वेक्षण पूर्ण होऊन त्याचा अहवाल शासनास सादर झाला आहे का, याची विचारणा खडसे यांनी केली. प्रकल्पाच्या मंजुरीला, निधीला आणि निविदा प्रक्रियेला का उशीर होत आहे आणि हा विलंब टाळण्यासाठी शासन कोणत्या उपाययोजना करत आहे, असा सवाल करत त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले. आमदार खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, ८०० मेगावॉटचा सुपर क्रिटिकल संच उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) विचाराधीन आहे. तथापि, केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) कोळशावर आधारित जुने संच किमान २०३० पर्यंत निवृत्त करू नयेत, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जुना संच तूर्तास बंद करण्यात आलेला नाही. तसेच, या प्रस्तावित नवीन प्रकल्पाची तांत्रिक व वाणिज्यिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, अद्याप सविस्तर अहवाल शासनास प्राप्त झालेला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शासनाने दिलेल्या उत्तरात तांत्रिक बाबींचे कारण दिले असले, तरी जळगाव जिल्ह्याच्या आणि पर्यायाने राज्याच्या शाश्वत वीज पुरवठ्यासाठी हा ८०० मेगावॉटचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तातडीने मागवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम निर्धार आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला आहे.







