लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

विषेश प्रतिनिधी : शिवानंद पांचाळ नायगांवकर मागील काही वर्षांपासून आपण मतदार निवडणुकांचे स्वरूप पाहत आहोत ,त्यामध्ये लोकशाहीला मारक अशा बाबी दिसून येत आहेत. म्हणून आज त्या विषयासंदर्भात आपल्याशी चर्चा करण्याच्या हेतूने हा माझा छोटासा प्रयत्न! आज आपण एका अशा वळणावर उभे आहोत, जिथे आपली लोकशाही एका मोठ्या संकटातून जात आहे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य” म्हणजे लोकशाही,अशी व्याख्या आपण पुस्तकात वाचली. पण आज प्रत्यक्ष परिस्थिती काय आहेआज निवडणूक आली की, घराघरात पैशांची पाकिटे पोहोचतात, कोणी साड्या वाटतंय, कोणी जेवणावळी घालतंय, तर कोणी थेट रोख रक्कम देऊन तुमचे ‘मत’ विकत घेण्याचा प्रयत्न करतंय. मित्रहो, विचार करा… जो उमेदवार तुमचं मत विकत घेण्यासाठी आज पाचशे-हजार रुपये खर्च करतोय, तो निवडून आल्यावर तुमचे प्रश्न सोडवेल की त्याने खर्च केलेले कोटी रुपये वसूल करेल? जेव्हा आपण पैसे घेऊन मत देतो, तेव्हा आपण केवळ आपले मत विकत नाही, तर आपण आपल्या मुलांचे भविष्य, आपल्या गावचा विकास आणि आपला स्वाभिमान विकत असतो. जो पैसे देऊन निवडून येतो, त्याला जनतेची भीती राहत नाही. त्याला वाटते, “मी तर पैसे देऊन मतं घेतली आहेत, आता मला काम करण्याची काय गरज?” हा भ्रष्टाचाराचा उगम आहे. दुसरीकडे, आपल्याला जाती-धर्माच्या नावाखाली वाटण्याचे प्रयत्न होत आहेत.
राजकारणी आपल्याला सांगत आहेत की, “हा आपल्या जातीचा आहे, म्हणून यालाच मतदान करा.” पण विचार करा, जेव्हा दवाखान्यात रक्ताची गरज लागते किंवा बेरोजगारीमुळे तरुण वणवण भटकतो, तेव्हा जात कामाला येते का? विकासाला जात नसते आणि गरिबीला धर्म नसतो. आपल्याला जातीचा नेता नको, तर जो सर्वांना सोबत घेऊन विकास करेल असा ‘नीतिमान’ नेता हवा आहे. लोकशाहीने आपल्याला ‘मतदान’ नावाचे एक अस्त्र दिले आहे. हे अस्त्र कोणाकडे किती पैसा आहे हे पाहत नाही. श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाच्या मताची किंमत एकच आहे. पण आपण जर हे अस्त्रच विकले, तर लोकशाहीचे अस्तित्व संपायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रलोभनांना बळी पडू नका कोणीही पैसे दिले तरी ते घेऊ नका, आणि दिलेच तर लक्षात ठेवा – तुमचं मत विकू नका. उमेदवाराची पात्रता तपासा, उमेदवाराचे चारित्र्य, त्याचे शिक्षण आणि त्याची काम करण्याची जिद्द पहा. प्रश्न विचारायला शिका,पाच वर्षे गायब राहणारे लोक निवडणुकीच्या काळातच का दिसतात? हा प्रश्न त्यांना धारेवर धरून विचारा.शेवटी इतकंच म्हणेन..”मत विकू नका,
स्वाभिमान जपा;कारण तुमचं एक चुकीचं मत पाच वर्षांचा अंधार घेऊन येऊ शकतं.”म्हणून आपण पैशाला नाही तर विकासाला मतदान करा, जातीला नाही तर माणुसकीला आणि कर्तृत्वाला मतदान करा!







