आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड.
विषेश प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर मित्रांनो प्रत्येक गावोगावी विशेषकरून मोठ्या उत्सवाच्या रूपाने साजरे होणारे कार्यक्रम म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम दिसून येतात. तसेच यासारखे जवळपास सर्वच बहुजन क्रांतिकारक महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम आता प्रत्येक गावोगावी साजरे होत असताना दिसत आहेत.
काही गावांमध्ये वेगवेगळ्या अनेक जाती धर्माची जमातींची लोक नांदत आहेत. अशा गावात एखाद्या विशिष्ट जातीने एखाद्या महापुरुषाची जयंती त्यांच्याच गल्लीमध्ये साजरी केली जात असते, परंतु संपूर्ण गाव त्यात सामील नसतो. अशी उदाहरणे पहावयास मिळत आहेत. ही बाब म्हणजे महापुरुषांच्या विचारांचा अपमान आहे.
यातील आजच्या काळातील अत्यंत गंभीर समस्या म्हणजे प्रत्येक समाजातील आपसातील मतभेद, गटातटात विभागणी, व्यसनाधीनता, राजकीय स्वार्थ, अज्ञानता यासारख्या इतर अनेक कारणांमुळे अशा कार्यक्रमांमध्ये वाद होणे, विस्कळीत होणे, प्रसंगी हिंसात्मक घटना घडवून गावाचे सामाजिक नुकसान होणे अशा घटना घडलेल्या पहावयास मिळत आहेत.

अशा समस्यांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात समस्त गावकऱ्यांच्या वतीने असे जयंतीचे उत्सवाचे कार्यक्रम साजरी केल्यास गावात एकता बंधुता वाढून गावाची प्रगती होईल, विकास होईल.
म्हणून प्रत्येक गावातील लोकांनी एकत्र येऊन एक गाव एक जयंती असा संकल्प करावा.
आपल्या समाजाची एकता टिकवण्यासाठी आणि महापुरुषांच्या विचारांचा सन्मान राखण्यासाठी गावातील सर्व मंडळांनी एकत्र येऊन गावात एकच मध्यवर्ती समिती स्थापन करावी.
👉कोणत्याही एका मंडळाच्या नावाखाली काम न करता ‘जयंती उत्सव समिती,समस्त बोरगाव,’ असे तटस्थ नाव द्यावे.
👉समितीमध्ये प्रत्येक प्रभागातील किंवा गटातील दोन प्रतिनिधींचा समावेश असावा,
👉 व्यसनमुक्त उत्सव: मिरवणूक किंवा कोणताही कार्यक्रम असो, मद्यपान करून कोणीही कार्यक्रमात येणार नाही. तसेच असा बोर्ड मुख्य ठिकाणी लावावा.
👉 हिशोबाची पारदर्शकता ठेवण्यासाठी वर्गणीची पावती प्रत्येक दात्याला दिली जावी आणि उत्सवानंतर ७ दिवसांच्या आत जमा-खर्चाचा हिशोब सार्वजनिक केला जावा.
👉ध्वनी प्रदूषण व डीजेवर मर्यादा ठेवावी/ किंवा लाऊच नये आणि मोठ्या आवाजाच्या डीजेपेक्षा पारंपरिक वाद्ये किंवा प्रबोधनात्मक गीतांना प्राधान्य द्यावे.
👉 कार्यक्रमाला वेळेचे पालन करावे. मिरवणूक किंवा व्याख्याने ठराविक वेळेतच सुरू होऊन संपली पाहिजेत.
👉केवळ मिरवणूक न काढता, समाजाला दिशा देणारे कार्यक्रम ठेवावेत. त्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन व विक्री, तरुणांना वाचते करण्यासाठी पुस्तकांचे स्टॉल लावणे. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करणे.,आरोग्य शिबिर, रक्तदान किंवा मोफत आरोग्य तपासणी शिबीर लावणे. इत्यादी कार्यक्रम करावेत.
👉सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात राजकीय तटस्थता ठेवून जयंतीच्या मंचाचा वापर राजकीय भाषणांसाठी न करता केवळ महापुरुषांच्या विचारांच्या प्रसारासाठी करावा.
👉सर्व पक्षांच्या नेत्यांना ‘अतिथी’ म्हणून बोलवावे, पण मुख्य केंद्रस्थानी ‘विचार’ असावा.








