जंगल कमी;धोका जास्त, बिबट्यांच्या हालचालींचा महाराष्ट्र..
महाराष्ट्रातील डोंगराळ, जंगलांनी वेढलेल्या भागांमध्ये गेल्या काही वर्षांत बिबट्यांच्या हालचाली वाढत चाललेल्या दिसत आहेत. ग्रामीण भागात माणसांवर, पाळीव जनावरांवर होणारे हल्ले आणि त्यातून होणारे मृत्यू हा प्रश्न आज लोकभावनांना भिडणारा आणि प्रशासनाला सतत जागं करणारा ठरतो आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न असा उभा राहतो; खरंच कोणाच्या जीवाची किंमत जास्त..? माणसाची की बिबट्याची..?
मानवी मृत्यू झाला की गावात संताप उसळतो, आंदोलने होतात, राजकारण सुरू होते; आणि प्रशासन बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्यांचे जाळे पसरवते. परंतु हे दृश्य पाहताना एक गोष्ट मागे पडते; संघर्षाची खरी मुळे कुठे
आहेत..?
जंगलतोड, वेगाने वाढलेले शहरीकरण, रस्ते, धरणे, सिंचन प्रकल्प या सगळ्यामुळे बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास तुटत चालला आहे. त्यांच्या पाण्याचे स्रोत, भक्ष्य प्रजाती, सुरक्षित जागा सर्वच कमी होत आहेत. जेव्हा जंगलांमध्ये अन्नाची कमतरता भासते, तेव्हा बिबट्या गावातील भटक्या कुत्र्यांवर किंवा पाळीव जनावरांवर सहज हल्ला करतो. आणि याच मार्गाने तो हळूहळू मानव वस्त्यांपर्यंत पोहोचतो.
माणसाचा जीव महत्त्वाचा आहेच, परंतु बिबट्याचा जीवही पर्यावरणासाठी तितकाच महत्त्वाचा आहे, हे विसरता कामा नये. बिबट्या हा परिसंस्थेतील एक महत्वाचा ‘कंट्रोलर’ आहे. तो भक्ष्य प्रजातींचे संतुलन राखतो, जंगलातील जैवविविधतेला गती देतो आणि निसर्गाचा समतोल टिकवतो. बिबट्यांची संख्या कमी झाली तर संपूर्ण पर्यावरणीय साखळी विस्कटण्याचा धोका असतो. त्यामुळे हा प्रश्न “माणूस vs बिबट्या” असा नाही, तर दोघांचाही जीव कसा वाचेल.? असा आहे.
अर्थात, प्रशासन काहीवेळा पिंजरे लावून, बिबट्यांना पकडून इतरत्र सोडते; काही ठिकाणी तातडीने उपाय केले जातात. पण हे उपाय तात्पुरते ठरतात. बिबट्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवल्याने तो नव्या भागातही संघर्ष निर्माण करतो. त्यामुळे या प्रश्नाला कायमस्वरूपी उपायांची गरज आहे.
जंगलांचे नैसर्गिक वातावरण पुन्हा निर्माण केल्याशिवाय बिबट्या जंगलात राहणार नाही. पाणवठे, भक्ष्य प्रजातींची वाढ, वनक्षेत्राचे संरक्षण हे प्राथमिक पायऱ्या आहेत. दुसरे म्हणजे, जंगलालगतच्या मानवी वस्त्यांत सुरक्षिततेची तजवीज. रात्रीची प्रकाशव्यवस्था, कुंपण, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण, कचरा व्यवस्थापन यामुळे बिबट्या गावात येण्याची शक्यता कमी होते. तिसरे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान. CCTV, ड्रोन, GSM कॉलर, थर्मल कॅमेरे यामुळे बिबट्यांची हालचाल आधीच कळून अनेक दुर्घटना टाळता येतात. चौथे म्हणजे जनजागृती. शाळा, ग्रामसभा, स्वयंसेवी संघटनांद्वारे बिबट्या दिसल्यावर कसे वागावे, काय करू नये हे सांगणे अत्यावश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचे मानवहानी किंवा जनावरांच्या मृत्यूबाबत नुकसान भरपाई वेळेत मिळणे, जेणेकरून भावनांच्या भरात प्राणी मारण्याचे प्रकार घडू नयेत.
महाराष्ट्राने हा प्रश्न भावनांनी नव्हे तर शहाणपणाने हाताळायला हवा. जंगलांचे रक्षण, बिबट्यांचे संरक्षण आणि मानवी सुरक्षितता ही तीनही गोष्टी एकत्र शक्य आहेत. संघर्ष कमी करून सह अस्तित्वाचा मार्गच दीर्घकाळ टिकणारा उपाय आहे.
आज प्रश्न हा नाही की जीवाची किंमत कोणाची जास्त. प्रश्न हा आहे की दोन्ही जीव महत्त्वाचे असताना आपण न्याय कोणाला देणार..? निसर्गाला की भावनेला..? या प्रश्नाचे उत्तर संवेदनशील धोरणांत, वैज्ञानिक नियोजनात आणि लोकांच्या जागरूकतेत दडलं आहे.
लेखक जमील देशपांडे अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान जळगाव..








