मायमातीची ओढ, सौ. प्रभावती पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास ..

शहराच्या धावपळीत रमणं सोपं आहे, पण खेड्याची माती, तिथले प्रश्न, तिथलं अपूर्ण स्वप्न यांची जबाबदारी आपलीच आहे, ही जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या काही थोर व्यक्ती समाजाला खऱ्या अर्थाने दिशा दाखवतात. अशाच थोर व्यक्तींमध्ये नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे माय माती फाउंडेशनच्या संस्थापक सौ. प्रभावती पाटील यांचं.
जळगाव शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर, आवार ग्रामपंचायतीच्या हद्दीत त्यांनी एक नवं विश्व उभं केलं आहे. रोजच्या प्रवासातून, अखंड जिद्दीने आणि अविरत परिश्रमातून त्यांनी शिक्षण आणि पर्यावरण यांची एक वेगळी चळवळ सुरू केली आहे. “चांदोबाची शाळा”- नाव ऐकलं की गावकुसाशी जोडलेलं निरागस बालपण डोळ्यांसमोर येतं. या शाळेत फक्त पाटी-वरचं शिक्षण नाही, तर गावकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यांत शिक्षणाची आस निर्माण होते. गंमत-जोड शब्दाचं रीडिंग अँड लर्निंग सेंटर हे मुलांच्या शिकण्याला खेळकर वळण देतं. गावातल्या निरागस चेहऱ्यांवर ज्ञानाचा उजेड पसरवणं म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीच. “सोनसावली” वृक्षारोपणाकरता खास जागा ही केवळ हिरवळीची पट्टी नाही. ही आहे गावकऱ्यांच्या मनात हरित विचार रुजवण्याची शाळा. प्रभावती पाटील केवळ झाडं लावत नाहीत, तर त्यांचं संगोपन करून पर्यावरणाचा श्वास गावात टिकवून ठेवतात. गावकऱ्यांना पर्यावरणाची खरी ओळख करून देत, त्यांना या लढाईत सहभागी करून घेतात.

गावाशी संवाद, गावाशी आपलेपणा समाज बदलतो तो केवळ आज्ञांनी नाही, तर आपुलकीने. प्रभावती पाटील यांनी गावकऱ्यांना सोबत घेतलं, त्यांचं समाधान केलं आणि त्यांना पर्यावरण व शिक्षणाच्या वाटेवर नेलं. त्यांची पद्धत ही उपदेशाची नसून सहभागाची आहे.
आज बहुतेक उपक्रमांना शासकीय अनुदानाची वाट बघावी लागते. पण या कार्याला अनुदान नाही, तरीही ते थांबलं नाही. कारण ही चळवळ पैशावर नाही, तर मातीवरच्या प्रेमावर आणि खेड्याबद्दलच्या ओढीवर उभी आहे. खरं कौतुक असं की,शहरातल्या सुखसोयी असूनही खेड्याची हाक ऐकून सौ. प्रभावती पाटील यांनी ग्रामीण शिक्षणाला नवा श्वास दिला आणि पर्यावरण संवर्धनाची खरी मशाल पेटवली आहे. शिक्षणाची ज्योत पेटवणं, पर्यावरणाचा संदेश देणं, खेड्याला नवी दिशा दाखवणं हेच त्यांचं ध्येय ठरलंय.अनुदान नसूनही जिद्द अबाधित आहे, माय माती फाउंडेशनमुळेच हे कार्य उजळून निघालंय.
अशा मायमातीच्या लेकीला सलाम, जी समाजासाठी नव्या वाटा दाखवते, स्वप्नांना वास्तवात उतरवते आणि खेड्याच्या भविष्यासाठी झटते. झाडांची सावली आणि , ज्ञानाची ज्योत हीच खरी ग्रामीण क्रांती..! ॲड जमील देशपांडे, अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान, जळगांव








