माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प…!

भडगाव (प्रतिनिधी) भडगाव : पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील पावले उचलत माऊली फाऊंडेशनने २०२५ या वर्षासाठी ‘५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. या अभियानाचा शुभारंभ साई समर्थ मतीमंद शाळा, नाचणखेडा रोड येथून मोठ्या उत्साहात करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता जाधव, जनमंच संस्थाध्यक्ष शिवराम पाटील, शेतकरी संघ संचालिका व नगरसेविका योजना पाटील, मोरसिंग राठोड, निलेश मालपुरे, शांताराम पाटील, गुलाबसिंग पाटील, राजेश वाघ, तसेच साई समर्थ मतीमंद शाळेचे अधीक्षक आणि अन्य सहकारी वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

प्रास्ताविकामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. “सजीव सृष्टी वाचवायची असेल, तर वृक्षसंवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही,” असे मत मान्यवरांनी मांडले. कार्यक्रमात फाऊंडेशनच्या वतीने भविष्यात आयोजित होणाऱ्या रक्तदान शिबिर, मोफत रोगनिदान शिबिर आणि प्रबोधनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले. या उपक्रमामुळे भडगाव परिसरात पर्यावरणपूरक जनजागृती होण्यास हातभार लागेल, असा विश्वास माऊली फाऊंडेशनच्या सदस्यांनी व्यक्त केला.








