हरीविठ्ठल नगर येथील गटारींचे निर्माण व रिक्षा स्टॉप येथे मोबाईल टॉयलेट तात्काळ उभारण्यात यावे, मनपा आयुक्त यांना मनसेचे निवेदन. सदर निवेदनाद्वारे आम्ही आपले लक्ष हरीविठ्ठल नगर परिसरातील दोन अत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या समस्यांकडे वेधू इच्छितो.
१. गटारींचा अभाव आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या: हरीविठ्ठल नगर परिसरात काही ठिकाणी काँक्रीट रस्त्यांची कामे पार पडलेली असली तरीदेखील त्या ठिकाणी आवश्यक त्या गटारींचे काम करण्यात आलेले नाही. परिणामी पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर व घरांवर पडणारे पाणी वाहून जाण्याऐवजी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हरीविठ्ठल नगर परिसरात तात्काळ गटारीचे काम सुरू करून पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, ही नम्र विनंती.
२. मोबाईल टॉयलेट व सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता: हरीविठ्ठल नगर हा झपाट्याने विस्तारलेला व वस्तीचा घनता असलेला परिसर असून येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध नाही. विशेषतः हरीविठ्ठल नगर रिक्षा स्टॉप परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना अत्यंत गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. महिलांसाठी ही परिस्थिती आणखीनच अडचणीची व असुरक्षित आहे.

तरी, सदर ठिकाणी तात्काळ मोबाईल टॉयलेट व सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी, ही विनंती.
महोदय, वरील समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि येत्या १० दिवसांच्या आत कार्यवाही करावी, अशी आमची अपेक्षा आहे.
अन्यथा, स्थानिक नागरिकांच्या वतीने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शैलीने आपल्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडू, याची कृपया नोंद घ्यावी.
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष, राजेंद्र निकम उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार ,महिला शाखाध्यक्ष, अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, ॲड. सागर शिंपी, संजय मोती, तसेच हरी विठ्ठल नगर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









