जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटल्याचे सांगितले असून, लवकरच त्यांना कंठस्नान घातले जाईल, असे म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून, दहशतवाद्यांचे मनसुबे हाणून पाडले जातील.जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल मोठे विधान केले. मनोज सिन्हा म्हणाले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांना संपवले जाईल. गांधी स्मृती येथे ‘जम्मू-काश्मीर: शांती की ओर’ या विषयावर व्याख्यान वेळी ते बोलत होते. काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे ठामपणे सांगितले. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. यावेळी फक्त पर्यटकांना टार्गेट करण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांची हत्या गोळ्या झाडून करण्यात आली.
भारताकडून पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 6 आणि 7 मे च्या दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. मनोज सिन्हा म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला जोरदार उत्तर देण्यात आले. हल्लेखोरांची ओळख पटली आहे आणि मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की आता त्यांचे जिवंत राहणे कठीण आहे. चांगली बातमी नक्कीच येईल, पण लगेचच तारीख सांगणे योग्य नाही.मनोज सिन्हा यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात विविध दहशतवादी संघटनांचे प्रमुख मारले गेले आहेत आणि त्यांचीही तीच गत होणार आहे.









