‘मोदी-शाहांनी किमान 25 वेळा शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. माझ्याकडे व्हिडीओ आहेत, फडणवीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्या अंगावर वंगण टाकून त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. गायकवाड यांच्या तोंडाला शिवधर्म प्रतिष्ठान संघटनेने काळे फासले. या हल्ल्याचे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. माझ्यासह पुरोगामी विचार मंडणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव कांबळे नावाच्या आमच्या मित्राने मुंबईत रजिस्टर केलं आहे. टेक्निकल अडचण आहे. आता तो म्हणतो की, छत्रपती म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या दीपक काटेच्या (Deepak kate) संघटनेचे नाव शिवधर्म हे एकेरी नाही का? आता बजरंग दल हे नाव देखील एकेरी नाव आहे. त्याचा उल्लेख देखील श्री बजरंग दल करायला हवं ना? ज्यावेळी कोरटकर, राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांवर बोलत होते त्यावेळी ही संघटना कुठे गेली होती, असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला. मी सभागृहात आज विषय मांडणार आहे. जनसुरक्षा विधेयकाचा निमित्ताने यांनी कट्टर डाव्या संघटनांवर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हीदेखील कट्टर उजव्या संघटनांवर बंदी आणण्याचा विचार करणार आहोत, असे मिटकरी यांनी म्हटले.प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत आहे. माझं देवेंद्र फडणवीसांना आवाहन आहे की, नरेंद्र मोदी , अमित शहांनी किमान पंचवीस वेळा शिवाजी महारांचा एकेरी उल्लेख केलाय. मी व्हिडीओ देतो. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा. माझं मुख्यमंत्री आणि अजित पवारांना आवाहन आहे की , जनसुरक्षा विधेयकाच्या अंतर्गत पहिली कारवाई दिपक काटे याच्यावर झाली पाहिजे. जशास तसे उत्तर दिले जाईल. तुरुंगात जायची तयारी आहे. सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.मराठा हा शब्द संकुचित करण्यात आला आहे. फक्त संभाजी ब्रिगेडच नाही तर पुरोगामी संघटना एकत्र यायच्या. पण आपापसात मतभेद व्हावेत यासाठी आरएसएसवाले काम करतात. रेशीम बागेकडून फुट पाडली जाते. प्रविणवरील हल्ल्याचा बदला घ्यायचा असेल तर आपण एकत्र आलो पाहिजे. संघटनेत नवे तरुण आले पाहिजेत , तरच क्रांती होईल, असे मत संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.









