कोल्हापुरात दुर्दैवी घटना घडली आहे. पावसात दुचाकीवरून जाताना छत्री उलटल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. मीना दिलीपराव मगदूम असे त्यांचे नाव आहे. त्या महानगरपालिकेत कार्यरत होत्या. सोमवारी त्या मुलासोबत जात असताना हा अपघात झाला. वाऱ्यामुळे छत्री उलटली आणि त्या खाली पडल्या. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि मुलगी आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.पावसाळ्याच्या दिवसात गाडीवरून प्रवास करताना बहुमतांशी रेनकोटचा वापर केला जातो. मात्र काही जण गाडीवर पाठीमागे छत्री धरून बसत असतात. मात्र ही सवय जीवावर बेतण्याचा धोका अशतो. अशीच एक दुर्दैवी घटना कोल्हापूर शहरात नुकतीच घडली आहे. दुचाकीवरून जाताना पावसात डोक्यावर धरलेली छत्री उलटल्यामुळे तोल जाऊन डोक्यावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या 59 वर्षीय मीना दिलीपराव मगदूम या शहरातील संभाजीनगर जवळील ताराराणी कॉलनीमध्ये राहत होत्या. त्यांचे पती दिलीप मगदूम हे 25 वर्षांपूर्वी महापालिकेतच कामाला होते. मात्र त्यांच्या अकाली मृत्यूनंतर मीना यांना अनुकंपा तत्वावर महानगरपालिकेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली होती. दोन मुले आणि मुलीची संपूर्ण जबाबदारी उचलत खचून न जाता त्यांनी मुलांना मोठे केले. मुलांचे शिक्षण पूर्ण करत नंतर लग्न लावून दिले होते. दीड महिन्यापूर्वीच त्यांनी आपल्या लहान मुलाचे लग्न लावून दिल्यानंतर आयुष्याचा उरलेला वेळ सुखा-समाधानाने व्यतीत करण्याचं ठरवलं होतं. मात्र त्याआधीच काळाने मीना यांच्यावर घाला घातला.मीना यांचा मोठा मुलगा सोनार काम करतो. तर मोबाईल दुकानात काम करणारा लहान मुलगा मीना यांना महापालिकेत सोडून कामावर जायचा. रोजच्या प्रमाणे सोमवारी (1 जुलै) मीना या लहान मुलासोबत दुचाकीवरून महापालिकेत जात होत्या. पावसाची उघडझाप सुरू असल्याने त्यांनी छत्री डोक्यावर धरली होती. महाद्वार रोड परिसरात वेगान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांची छत्री उलटली. यावेळी तोल जाऊन मीना या दुचाकीवरून खाली डोक्यावर पडल्या आणि गंभीर दुखापतीमुळे नाका-तोंडातून रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.आयुष्य कष्टात घालवलं, सुख घ्यायचं राहून गेलं…मीना यांनी मोठ्या कष्टाने एकटीने आपल्या मुलांना मोठं केलं होतं. स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या त्यांच्या मुलाने नुकताच नवीन फ्लॅट संभाजीनगर परिसरात घेतला होता. पुढचे आयुष्य मुलांसोबत आनंदाने जगण्याचं त्यांनी ठरवलं होतं. मात्र अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.









