राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सावध भूमिका घेत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.मुंबई: तीन वर्षांपूर्वी राज्यात उद्धव ठाकरे ंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं. या बंडानंतर उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय वाताहत झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात पक्षात सर्वात मोठं बंड झालं. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर पक्ष आणि चिन्हदेखील ठाकरेंच्या हातून गेलं. आता शिंदे यांनादेखील तशाच फुटीची भीती वाटत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेत्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेला एक प्रस्ताव लक्षवेधी ठरला आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल संपन्न झाली. त्यात काही महत्त्वाचे ठराव मांडले गेले. यातील शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनाचा प्रस्ताव सर्वाधिक लक्षवेधी ठरला. पक्षफुटीचा उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठा फटका बसला. बहुतांश आमदार, खासदारांनी त्यांची साथ सोडली. नेत्यांनीदेखील शिंदेसेनेची वाट धरली. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखांवर शिंदेसेनेत गेलेल्या नेत्यांनी दावे सांगितले. त्यामुळे ठाकरे आणखी अडचणीत आले.पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या हातून अनेक मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखा कशा निसटल्या, याची पूर्ण कल्पना एकनाथ शिंदेंना आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांनी सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.









