इंदौरमध्ये हनीमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनमने हत्या केली. सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह याच्यासह एकूण चार जण अटकेत आहेत.इंदूर: हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची त्याच्याच पत्नीनं अतिशय निर्घृणपणे हत्या घडवून आणली. या प्रकरणी सध्या आरोपी पत्नी सोनमसह आणखी चार जण अटकेत आहेत. त्यात सोनमचा प्रियकर राज कुशवाहचादेखील समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासातून आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे. राजाच्या हत्येपूर्वी सोनम आणि राजनं एका तरुणीच्या हत्येची योजना आखलेली होती.
राजा आणि सोनम यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात निश्चित झाला. पण सोनमचं राजवर प्रेम होतं. कुटुंबाचा त्यांच्या संबंधांना विरोध होता. लग्न निश्चित झाल्यावर सोनमनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. इंदूरजवळून एक नदी वाहते. त्या नदीच्या काठावर सोनम बऱ्याचदा फिरायला जायची. याच नदीच्या किनारी स्वत:ची स्कूटर उभी करायची. आपली ओळख पटेल, अशा वस्तू स्कूटरवर ठेवायच्या. आपण नदीत बुडालो आहोत, असा देखावा तिला उभा करायचा होता. त्यानंतर ती गायब होणार होती. पण कुटुंबासाठी ती मरणार होती. पण या भागात बरीच वर्दळ असल्यानं अनेक सीसीटीव्हींमध्ये आपण दिसू शकतो, असा विचार करुन सोनमनं ही योजना गुंडाळली.यानंतर सोनमनं आणखी एक प्लान रचला. आपल्याच वयाच्या, आपल्यासारखीच अंगकाठी असलेल्या तरुणीला जिवंत जाळण्याचा कट तिनं आखला. या तरुणीला सोनम स्वत:च्या स्कूटरसह जिवंत जाळून मारणार होती. त्याआधी तिला स्वत:चे कपडे घालणार होती. अपघात होऊन सोनम जिवंत जळाली, असं दाखवण्याचा तिचा प्रयत्न होता. त्यासाठी स्कूटरसोबत ती स्वत:ची ओळख पटेल अशा काही वस्तू ठेवणार होती. कुटुंबाच्या नजरेत मरायचं, पण प्रत्यक्षात जिवंत राहायचं, असं तिचं कारस्थान होतं.राजासोबत लग्न ठरल्यावर राज आणि सोनमनं फेब्रुवारीत याबद्दलची योजना आखली. पण सोनम आणि राज सराईत गुन्हेगार नव्हते. त्यामुळे त्यांना सोनमसारख्या दिसणाऱ्या कोणत्याही तरुणीला विश्वासात घेता आलं नाही. मग त्यांनी या योजनेलाही मूठमाती दिली. त्यामुळे एका निष्पाप तरुणीचा जीव वाचला. पण याचमुळे राजा रघुवंशीचा जीव गेला. स्वत:च्या हत्येचा बचाव रचता येत नसल्यानं मग आता राजाच्या हत्येशिवाय पर्याय नसल्याचं सोनमच्या लक्षात आलं. यानंतर हनिमूनसाठी मेघालयला गेले असताना तीन मारेकऱ्यांच्या मदतीनं राजाची हत्या करण्यात आली.









