राज्यात हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका विवाहीतेला सासरच्या लोकांनी पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी माहेरहून ३० लाख रुपये आणायला सांगितले. हुंडा आणि करणीच्या नावाखाली विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ केला. तिच्या मनाविरुद्ध तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर उदगीर पोलीस ठाण्यात सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उदगीरमध्ये घडलेल्या या घटनेने हुंडाबळीच्या घटना पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आल्या आहेत. महिलेला सासरच्या लोकांनी माहेरहून ३० लाख रुपये आणण्यास सांगितले.
“तीस लाख रुपये घेऊन ये, त्याशिवाय मूल होऊ देणार नाही,” असं ते पीडितेला म्हणाले. तिला उपाशी ठेवलं आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ देखील करण्यात आला. ती चार महिन्यांची गर्भवती असताना, तिच्या नवऱ्याने, सासू-सासऱ्यांनी आणि नणंदेने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. यामुळे तिचा गर्भपात झाला. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यात विवाहित महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना समोर येत आहेत.या प्रकरणी फिर्यादी महिलेने तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधला. त्यांनी तिला पोलिसात तक्रार नको करु, असं सांगितलं. पण महिलेने स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी महिलेला नवीन पेट्रोल पंप सुरु करायचा आहे, यासाठी माहेरहून पैसे आणायला दबाव टाकला. पैसे न आणल्यामुळे तिला त्रास दिला गेला. तिला उपाशी ठेवले, मारहाण केली आणि तिचा मानसिक छळ केला गेला.या घटनेमुळे समाजात हुंडा मागणीच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हुंडा मागणी आणि हुंडाबळीच्या विरोधात कठोर कायदे असूनही अशा घटना घडत आहेत, हे दुर्दैवी आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे आणि आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. समाजात महिलांच्या संरक्षणासाठी आणि हुंडा मागणीसारख्या सामाजिक समस्यांवर आळा घालण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.









