नवी दिल्ली, दि. २८ (प्रतिनिधी) : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय तसेच जागतिक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना ‘अमित कृषी ऋषी अवॉर्ड २०२५’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. अमित सिंह मेमोरियल फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार आधुनिक शेतीतील नवोन्मेषी, ठिबक, तुषार सिंचन, टिश्युकल्चर या सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा कामगिरीबद्दल दिला जातो. अनिल जैन यांच्यावतीने हा पुरस्कार कंपनीचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील यांनी स्वीकारला. या पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील जळगावची जैन इरिगेशन ही कंपनी राष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रातील एक आदर्श संस्थान म्हणून अधोरेखित झाली.पुरस्कार वितरण सोहळा बिहार कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत करण्यात आले होते. हा कार्यक्रम डॉ. एच. पी. सिंग (राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचे माजी अध्यक्ष) यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी डॉ. एस. एन. झा (भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक, अभियांत्रिकी), डॉ. संजय कुमार (भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञ नियुक्ती मंडळाचे चेअरमन), डॉ. आलोक के. सिक्का (अंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख) तसेच डॉ. ए. आर. पाठक (माजी कुलगुरू) या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.










