कल्याण येथे इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका आई, मुलगी आणि सूनेचाही समावेश आहे.कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरातील श्री सप्तशृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. सप्तशृंगी इमारतीला जागोजागी तडे गेले असतानाही प्रशासनाने ही इमारत धोकादायक घोषित केलेली नव्हती. जवळपास 35 वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीत 50 कुटुंबे राहत होती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सोमवारपासून लादीचे काम सुरू करण्यात आले होते. यादरम्यान, इमारतीला आणखी तडे गेल्याने इमारतीचा एका बाजूचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागासह आपत्ती दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
या दुर्घटनेत प्रमिला साहू (58), मनस्वी शेलार (2 वर्षे), सुनीता साहू (37), सुजाता पाडी (32), सुशीला गुजर (78), व्यंकट चव्हाण (42) यांचा मृत्यू झाला. श्रद्धा साहू (14), अरुणा गिरनारायन (48), श्रावील शेलार (4 वर्ष), विनायक पाडी (4.5 वर्ष), यश क्षीरसागर (13) आणि निखिल खरात (26) हे जखमी झाले आहेत.मुलुंड येथे राहणान्या प्रमिला साहू नुकत्याच ओडिशातून आल्या होत्या. मंगळवारी सकाळीच त्या मुलगा, सून, नातवंडे आणि मुलीला भेटण्यासाठी कल्याणातील सप्तश्चुंगी इमारतीत आल्या होत्या. आईला भेटण्यासाठी प्रमिला यांची मुलगी सुजाता पाडी ४ वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती. मात्र, त्यांची ही भेट शेवटची ठरली. दुपारी झालेल्या दुर्घटनेत आई, मुलगी आणि सून या तिघींनी अखेरचा श्वास घेतला. कामावर गेलेल्या मुलगा नीलांचल याने तिघींचे मृतदेह पाहून टाहो फोडला. तर घरात आपल्या आई आजी समयेत असलेली श्रद्धा काही कारणासाठी दुसऱ्या खोलीत गेल्याने बचावली. मात्र, तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. तर दुसरीकड़े, सुजाताचा ४ वर्षाच्या विनायक या मुलाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तोही आपल्या आईला शोधत आहे.चौथ्या मजल्यावर लादीचे काम करणारा कामगार जितेंद्र गुप्ता सकाळपासून कारागीर व्यंकट चव्हाण बरोबरच होता. दुपारी त्याने जेवण आणलेले नसल्याने तो जेवण करण्यासाठी इमारतीखाली उतरला. कारागीर व्यंकट जेवून आराम करत होता. इतक्यात काळाने घाला घातला, आपण जेवून परत आल्यानंतर इमारतीतून आरडाओरडा आणि मदतीसाठी हाक ऐकू येत असल्याचं त्यांनी सांगितले.









